सांगली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. रविवारी (ता. ११) रात्री जिल्ह्यातील पलूस, कुंडल, वाळवा, बोरगाव, आंधळी, नागठाणे, बेडग या भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष उत्पादक (Grape Farmer) शेतकरी धास्तावला असून फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपर्यंत द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु ऑक्टोबरपर्यंत पाऊस असल्यामुळे छाटणी उशिरा झाली. सध्या सुमारे ४० टक्के क्षेत्रावरील बागा फुलोरा अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस कुठेही झाला नव्हता त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
रविवारी (ता. ११) रात्री द्राक्ष पट्ट्यातील पलूस, कुंडल, वाळवा, बोरगाव, आंधळी, नागठाणे, बेडग या भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. फुलोरा अवस्थेत असलेल्या घडामध्ये पाणी साचून घडकुज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे डाऊनी रोगासह अन्य रोगाचाही प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकऱ्यांनी बागेमध्ये फवारणीचे नियोजन केले असल्याचे चित्र पाहायला मिळते. ढगाळ वातावरण आणि पाऊस असाच राहिला तर द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.