
Nagar News : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर होताना दिसत आहे. उन्हामुळे कामाची पद्धत बदलली आहे. सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत काम करत दुपारी उन्हाच्या काळात काम करणे टाकळे जात आहे. उन्हामुळे शेत मशागतीची कामेही खोळंबली आहेत.
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने वातावरण बदल होत आहे. दीड महिन्यात सुमारे सात ते आठ वेळा जोरदार वादळ, पाऊस, गारपीट झाली. ऊन, ढगाळ वातावरण तर सततच होते. त्यामुळे कांदा, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले. पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे.
सध्या ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच उन्हाची तीव्रता जाणवते. सध्या उन्हाळी बाजरी, कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेचा शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच-साडेपाच अशी मजुरांची कामाची वेळ असते. सध्या मात्र सकाळी उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने सकाळी सात वाजता कामांवर येऊन सायंकाळी उशिरापर्यंत काम करायचे आणि दुपारी उन्हाच्या अधिक तीव्रतेच्या वेळी काम टाळायचे असे सुरू आहे.
मात्र या साऱ्या बाबीचा कामांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतमजूरांसह ग्रामस्थ व जनावरांचे हाल होत आहेत. उन्हामुळे पशू, पक्ष्यांचेही हाल होत आहेत.
झाडांच्या सावलीचा आधार
शेळ्या- मेंढ्यांसह पशुधनाला दुपारी झाडाच्या सावलीत बांधले जात आहे. त्यातच अनेकांची लोखंडी पत्र्यांची घरे आहेत. त्यात पत्रे तापत असल्याने आबालवृद्धांची गैरसोय होत आहे.
अंगाची लाही लाही होत असून, घामाच्या धारा वाहत आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने वऱ्हाडींचीही तारांबळ उडत आहे. जो तो झाडांच्या सावलीचा आधार घेत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.