
नामपूर, ता. सटाणा : यंदा जून महिन्यापासूनच संततधार पाऊस (Slow Rain) सुरू असल्याने निताणे गावालगत कुंदर शिवारात देवमळा नावाचा पाझर तलाव (Pazar Lake) भरला आहे. यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत (Agricultural Transportation) व विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी कुंदर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.
उन्हाळ कांद्यासह भाजीपाल्याला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतीमालाच्या विक्रीसाठी अडचणी उभ्या राहिल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
कुंदर वस्ती शिवारात सुमारे अडीचशे कुटुंबीय वास्तव्यास असून, तेथील शाळकरी मुलांना त्यांचे पालक डोक्यावर बसवून पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. अनेक पालक पाण्याच्या भीतीमुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होते.
रस्त्याला लागूनच देवमळा तलाव असल्याने पूर्णपणे रस्ता पाण्यात गेला आहे. एकीकडे शेतीमालाला भाव नाही. गेल्या काही महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात कांद्याची विक्री सुरू आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी येथील कांदा उत्पादकांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकामी लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.