
नागपूर : देश धान्य उत्पादनात (Food Production) खुप पुढे गेला मात्र अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे नाही. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानासोबत (Modern Technology) शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास यांनी केले.
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या (Indian Science Congress) निमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दास बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. सक्सेना होत्या.
पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॉ. एस. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ. प्रकाश ईटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.अन्नधान्याच्या उत्पादनात आपण फार मोठी प्रगती केली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे.
फॅमिली फार्मिंग ही नवीन संकल्पना आपण आणतो आहे. जैविक खाद्य पदार्थांना आपण पुढे नेतो आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे, असे डॉ. दास म्हणाले.
कुलगुरू डॉ. पातुरकर म्हणाले, की शेतीची व शेतीशी निगडीत व्यवसायाची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. पशू व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्धोत्पादन आणि नैसर्गिक शेती झाली पाहिजे. या शेतीचा एकूण शेत उत्पादनातील वाटा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे.
डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, आजही शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. मेहनती इतके उत्पन्न मिळत नाही. निसर्गातील बदलाचा देखील फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
देश, विदेशांतील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. अन्नधान्याच्या समृद्धतेसह आज आपण एकापेक्षा अधिक पिके घेऊ शकतो आहे. पुढील काळ शेती व शेतकऱ्यांसाठी निश्चितच समृद्धीचा काळ असेल.
कुलगुरू डॉ. चौधरी म्हणाले, की जे विज्ञान अस्तित्वात आहे, तेच आपण शिकतो आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी जोड व्यवसायासह आपल्या कौशल्याचा देखील वापर करावा.
डॉ. प्रकाश कडू यांनी अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली. विद्यापीठाने आतापर्यंत १७६ विविध पिकांचे वाण विकसित केले आहे. विदर्भातील ११ हजारावर गावांपर्यत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे. जैविक शेतीसाठी विद्यापीठ नियमित काम करीत असल्याचे डॉ. कडू यांनी सांगितले.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना राहीबाई पोपेरे म्हणाल्या, की सुरुवातीच्या काळात माझ्या कामावर टीका व्हायची, लोक हसायचे. आज ३ हजार ५०० महिलांना सोबत घेऊन २०० गावांमध्ये काम सुरू आहे. आपण पैसे देऊन विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे.
राहीबाई पोपेरे यांचा सत्कार
शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित बीजमाता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.