नाशिक ः चालू वर्षी अतिवृष्टीने (Heavy Rain) खरीप हंगाम (Kharif Season) वाया गेल्याने शेतकरी कोलमडून पडला. आता तो पुन्हा नव्या उमेदीने रब्बी हंगामाला (Rabi Season) सामोरा जात आहे. मात्र सुरुवातीपासून भारनियमन, (Loadsheding) अनेक भागांत कमी दाबाने व मधूनच खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे (Power Supply) पिकांना सिंचन करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ‘सांगा आम्ही शेती करू कशी?’ असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी राज्य सरकारपुढे उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या या तक्रारी आहेत. याशिवाय इतर तालुक्यात रोहित्र, नादुरुस्त वीजतारांमुळे दुर्घटना असे प्रकार वारंवार घडत असल्याने राज्य सरकार व महावितरण गांभीर्याने कधी पाहणार? शेतकऱ्यांची अडवणूक कधी थांबणार, असा शेतकरी वर्गातून सूर आहे. खरिपात उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने हाती पैसा नसल्याने शेतकरी नैराश्यात आहे. अशा परिस्थितीत ‘खचून जाऊ नका’ असा धीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकरी अनंत अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे ‘कथनी आणि करणी’त फरक असल्याचा सरकारवर आरोप होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू पेरणी, लेट खरीप व रब्बी उन्हाळ कांदा लागवडी सुरू होत आहेत. भाजीपाला पिके उभी आहेत. यंदा द्राक्ष हंगामात उशिराने छाटण्या झाल्या. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर सिंचन करण्यासाठी वीजपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी बदलत्या भारनियमन वेळा, त्यात मधूनच खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे पिकांना जगवायचे, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे.
शेतकऱ्यांना अडचणी
आठवड्यात ३ दिवस ८ तास दिवसा आणि उरलेले ४ दिवस ८ तास रात्रीची असते. दर महिन्याच्या १ तारखेस वेळापत्रक बदलते राहते असे का, असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तर वीजपुरवठा आठ तास केला जातो. त्यातही ती पाच पाच मिनिटाला वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे, असे कृषिभूषण सदूभाऊ शेळके यांनी कळविले.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या
- ग्रामीण भागात वीजपुरवठा वेळेवर नाही. होतो तो रात्री, त्यामुळे पूर्णदाबाने वीजपुरवठा हवा.
- लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र कुणीही आजी माजी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत.
- वीजपुरवठा मागणीप्रमाणे होत नसून त्यात कपात केली जाते. इंग्रजांच्या काळात आहोत की काय असा प्रश्न पडलाय.
- वीज मंडळाचे कर्मचारी कार्यालय सुरू ठेवून रात्री कामावर जातील का? शेतकऱ्यांवर असा अन्याय का?
- दिवाळीपासून बरेचसे रोहित्र नादुरुस्त आहे. पहिले बिल भरा आणि नंतरच रोहित्र देतो अशी शेतकऱ्यांची अडवणूक चालू आहे.
- कांदा लागवडी सुरू असताना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने डिझेल इंजिन वापर करून लागवडी कराव्या लागत आहेत.
- साप, विंचू, बिबट्यासारखे हिंस्र प्राण्यांचा सामना करून शेती करावी लागत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.