
Pune News : पंचायतराज धोरणात (Panchayat Raj Policy) बदल करण्यासाठी विशेष पंचायत तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या १३३ शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. (Latest Agriculture News)
निवृत्त सनदी अधिकारी सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या कृती दलात ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, निवृत्त सनदी अधिकारी व्ही. गिरिराज, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम, ‘बायफ’चे माजी अध्यक्ष गिरीश सोहनी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत व उपमुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग यांचा समावेश आहे.
केंद्र शासनाने केलेल्या ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यात झालेल्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्याच सूचनेनुसार राज्याला विशेष पंचायत तज्ज्ञ समिती नेमावी लागली होती. या समितीने सखोल अभ्यास करीत पंचायत राज विभागाचा आगामी १० वर्षांचा दूरगामी संकल्प आराखडा तयार केलेला आहे.
या समितीने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ मध्ये सुधारणा सुचविल्या आहेत. याशिवाय ग्रामपंचायतींच्या स्वनिधी उत्पन्नात कशी वाढ करता येईल, पंचायतींना मनुष्यबळ, अधिकार व कर्मचारी हस्तांतरण, राज्य निवडणूक आयोगाचे बळकटीकरण, राज्य वित्त आयोगाचे बळकटीकरण, लेखापरीक्षण, सामाजिक अंकेक्षण आणि जिल्हा नियोजन समित्यांच्या बळकटीकरणाबाबतदेखील शिफारशी केल्या आहेत.
सविस्तर कार्यपालन अहवाल सादर करावा
विशेष पंचायत तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कृतिबल तातडीने कार्यान्वित करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेश कुमार यांना दिले आहेत. कृती दलाने सविस्तर कार्यपालन अहवाल येत्या सहा महिन्यांत तयार करून राज्य शासनाला सादर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.