
Nashik Agriculture News : दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात मोहाडी परिसरात शनिवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व तुफान गारपीट (Hailstorm) झाली. या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये १०० टक्के नुकसान झाले आहे.
मात्र येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुरेश एकनाथ कळमकर यांनी बागेवर शेडनेट प्रकारातील कापड अंथरले होते. त्यामुळे नुकसान टळले आहे.
बदलत्या हवामानात व नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रयोगशीलता किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सुरेश कळमकर यांचे ३३ एकर क्षेत्र असून, २८ एकरांवर क्रिमसन व रेडग्लोब या रंगीत वाणांची लागवड आहे. तर एक एकर क्षेत्रावर सफेद रंगात सोनाका सिडलेस वाणाची लागवड असून, हा माल काढणीसाठी तयार होता.
दरम्यान, १५ एप्रिल रोजी गारपिटीच्या तडाख्यात शेजारील बागा नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. मात्र हा एकरभर बाग कापडी आच्छादनामुळे संकटातून वाचला आहे.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना द्राक्ष घडांची चकाकी गुणवत्ता व सूर्यप्रकाशपासून होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कागदी वेष्टण लावत असतात.
मात्र कागद रद्दी खर्च १२ हजार, कागद वेष्टण लावण्याची मजुरी १२ हजार तर माल काढणीपूर्वी कागद वेष्टण पुन्हा काढण्याची मजुरी २ हजार असा एकरी २६ हजार रुपये प्रत्येक वर्षी हंगामात येत असतो. मात्र यावर पर्याय म्हणून गेल्या पाच वर्षांपूर्वी कळमकर यांनी दीर्घकालीन उपाय शोधला.
एकरी ३० हजार रुपये खर्च करून शेडनेट प्रकारातील ५० मायक्रोन जाडीचे कापड जे ५० टक्के सूर्यप्रकाश छेदणारे तर ५० टक्के तीव्र हानिकारक सूर्यप्रकाश रोखणारे आच्छादन आहे.
हंगामात लावून व पुन्हा काढण्यासाठी एकरी ३ हजार रुपये खर्च त्यांना येतो. त्याचा वापर मात्र गारपिटीत सुद्धा झाल्याचे समोर आले आहे.
...असा झाला फायदा
बागेत बाष्पीभवन रोखण्यासह पानाचा एकसारखा हिरवेपणा, कार्यक्षमता वाढ,‘सनबर्निंग’चा कमी धोका व द्राक्षघडांचा एकसारखा रंग व वाढ असे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. तर गेल्या पाच वर्षांत कागद वेष्टण लावण्यासह मजुरीवर होणारी जवळपास १ लाख रुपये बचत झाली आहे.
कागदावर होणारा अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी शेडनेट प्रकारातील कापड अंथरण्याचा गेल्या ५ वर्षांपासूनची प्रयोग ते करत आहेत. मात्र यंदाच्या हंगामात काढणीच्या अंतिम टप्प्यात द्राक्ष काढणीस असताना तुफान गारपीट झाली. या गाराचा फटका थेट वेली व त्यात द्राक्ष घडांना लागला नाही.
गारा कापडावर साचल्याने नंतर त्या विरघळून गेल्या. त्यामुळे माल सुरक्षित राहिला तर वेली या तडाख्यात वाचल्या. त्यामुळे एकरी १० टन ५ लाख रुपयांची द्राक्ष सुरक्षित राहिल्याचे सुरेश कळमकर यांनी सांगितले.
त्यामुळे परिसरात हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, सचिव बाळासाहेब गडाख यांसह अनेक शेतकऱ्यांनी येथे पाहणी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.