मनमाड, जि. नाशिक : नैसर्गिक आपत्तीत (Natural Calamity) विमा कंपन्या (Crop Insurance) दिवाळखोरीत निघायला हव्या असताना त्यांना कोट्यवधींचा नफा होत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’मधून आपला बचाव कसा करायचा, यात मग्न असलेला विरोधी पक्ष, सध्या सुरू असलेले चिखलफेकीचे राजकारण आणि राज्य सरकारचा ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याऐवजी सुरू असलेला पंचनाम्यांचा धडाका हे नाटक असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेट्टी हे रविवारी (ता. ६) एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रभारी जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. एकीकडे रब्बीला उशीर झाला आहे. वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वत्र पावसामुळे मोठे नुकसान झाले. सरकारने पंचनाम्यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे. प्रशासनावर आणि विमा कंपन्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. विमा कंपन्यांनी दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम द्यायला पाहिजे होती, पण ती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
काटामारीतून कोट्यवधींचा काळा पैसा
ऊस मोजताना काटामारी केली जात आहे. या काटामारीत सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांची साखर तयार होते. यातून काळा पैसा तयार होतो. हा सगळा काळा पैसा निवडक दोनशे साखर कारखानदारांच्या घरात जात असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. पेट्रोलपंपावरील प्रणालीप्रमाणे राज्यातील दोनशे कारखान्यांच्या वजनकाट्यांवर प्रणाली बसवली पाहिजे. साखर आयुक्तांच्या कार्यालयावर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.