
यवतमाळ : यंदा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची (Farmer Suicide) संख्या वाढली आहे. काही महिन्यांतील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी (Farmer Death Data) भयावह आहे. याची माहिती संकलित करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील २०० गावांतून शेतकरी आत्महत्येची माहिती गोळा केली जाईल. नववर्षात ही माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली जाईल.
यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरला आहे. अतिवृष्टी, पूर तसेच सततच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याच काळात शेतकरी आत्महत्येची संख्याही वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वर्ष संपण्यापूर्वीच आत्महत्येचा आकडा वाढला.
खरीप हंगामात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असले, तरी रब्बीची सुरुवात होताच आत्महत्येच्या संख्येत घट दिसत आहे. याचाच अभ्यास करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी येडगे यांनी शेतकरी आत्महत्येचे सर्वेक्षण करण्याची योजना तयारी केली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी जनजागृतीची विशेष मोहीम राबविली जाईल. सर्वेक्षणानादरम्यान युवकांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती फेरी काढली जाईल. यंदा काही महिन्यातच शेतकरी आत्महत्येची संख्या मोठी होती. त्या काळात नेमक्या शेतीच्या स्थितीचा अभ्यास केला जाईल.
शेतकऱ्यांचे दुःख समजून घेणार
येडगे हे स्वत: शेतकरी तसेच त्यांच्या कुटुबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील. सध्या गावांची निवड करण्याचे काम सुरु आहे. शिवाय, शेतकरी कुटुंबांकडून माहिती संकलित करण्यासाठी अर्ज तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.