
Nashik News : उन्हाळ कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. आता कांदा साठवण्यापूर्वीच तो सडला तर काही कांदा चाळीस सडू लागला आहे, अशी बिकट परिस्थिती असतानाही कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली भाव मिळत आहे.
मात्र लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे.
कसमादे भागात वातावरण तापत आहे. त्याचाच प्रत्यय म्हणजे सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी घोषित केली आहे.
मुंजवाड येथील कांदा उत्पादक व शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुपच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी (ता. २१) याबाबत एकमुखाने निर्णय घेत ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर या गावबंदीचे फलक झळकविण्यात आले. राजकीय पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदे फेकून त्यांचे स्वागत केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नैसर्गिक संकटातून कशाबशा बचावलेल्या उत्पादनालाही बाजारपेठेत अत्यल्प दर मिळत आहे. सद्यःस्थितीत चांगल्या प्रतीचा कांदा अवघ्या २ ते ४ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
यातून उत्पादन खर्च दूरच, पण नुसते बाजार समितीपर्यंत माल नेण्याचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याची भीषण स्थिती आहे.
मात्र राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसत असून त्याची परिणिती म्हणून मुंजवाड ग्रामस्थांनी थेट राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रवेशबंदी जाहीर केली आहे.
शेतीप्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी गावातील तरुणांची एकी
मुंजवाड येथील तरुण शेतकऱ्यांनी शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत पुणतांबा धर्तीवर ग्रामसभेत ठराव करून बंद, धरणे आंदोलन, खासदारांना घेराव, तहसीलदारांना निवेदन आदी पर्याय अवलंबिण्यात आले.
तर सद्यःस्थितीतील कांदा दराच्या प्रश्नीदेखील शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (ता. २१) एकत्रित जमून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
गावात प्रवेश करणाऱ्या चारही दिशांच्या प्रमुख मार्गांवर राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करणारे फलक लावण्यात आले. या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून शासन व राजकीय पुढाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तर कांदे फेकून स्वागत करू...
अतिवृष्टी, गारपिटीचे अनुदानही मिळाले नाही. शिवाय कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाबाबत तीव्र नाराजी असूनही राजकीय पुढाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. त्याचा निषेध म्हणून आम्ही पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी पुकारली आहे. तरीही कोणी पुढाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने गावात प्रवेश केला तर त्यांच्यावर कांदे फेकून त्यांचे स्वागत होईल.
- केशव सूर्यवंशी, समन्वयक, शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुप, मुंजवाड.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.