
Yavatmal News : शेतात फवारणी करताना विषबाधेमुळे दरवर्षी देशात सहा हजार शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू होतो. पॅकिंग व लेबलिंग त्रुटींमुळे हे मृत्यू होत आहेत, अशी बाब शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांच्यासह जयंत बापट, विजय निवल व सतीश दाणी यांनी मंगळवारी (ता. २३) गडकरी यांची यवतमाळ येथे भेट घेतली. शेतकरी संघटनेकडून उपस्थित करण्यात आलेल्या या गंभीर प्रकाराची दखल घेत अवघ्या चोवीस तासांत गडकरी यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांना पत्र पाठविले.
फवारणी पाण्याचा पीएच अल्कधर्मी किंवा खूप अम्लीय असतो. त्यामुळे कीटकनाशक फवारणीची परिणामकारकता कमी होते. कीटकनाशक कायदा १९७१ मध्ये, कीटकनाशक उत्पादकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पीएच नमूद करणे बंधनकारक करण्यात आलेले नाही.
शेतकरी वारंवार फवारणीचा अवलंब करतात. त्यामुळे प्रदूषण होते. या शेतकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कीटकनाशक उत्पादकांवर पॅकिंग, लेबलिंग व माहितीपत्रकावर फवारणी पाण्याचा पीएच नमूद कारणे अनिवार्य केल्याने फवारणी कीटकनाशकांचा प्रभाव वाढेल, अशा आशयाचे निवेदन गडकरी यांना देण्यात आले.
‘एचटीबीटी’च्या क्षेत्रात वाढ
मागील दहा वर्षांपासून राज्यात बेकायदेशीर एचटीबीटी कापसाचे क्षेत्र वाढत आहे. दोन मजूर एका दिवसात दोन एकर क्षेत्रावर तणनाशकाची फवारणी करतात. एचटीबीटी तंत्रज्ञानामुळे शेती सहज व सोपी होते.
कापूस उत्पादक अगतिक आहे म्हणून बेकायदेशीर एचटीबीटी कापसाची लागवड करतात. अशा या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये. एचटीबीटी कापसाला बेकायदेशीर संबोधणे हेच बेकायदेशीर आहे, असेही मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.