
Pune News ः शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) थांबाव्यात यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या (Kisanputra Agitation) वतीने जाहीर करण्यात आलेल्या बळीराजासाठी अन्नत्याग आंदोलन (Hunger Strike) रविवारी (ता. १९) होणार आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने सोमवारी (ता. १३) किनगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथून निघालेल्या पदयात्रेचा समारोप धुळ्यात जेल मैदान येथे सभा घेऊन होणार आहे.
या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (अकोला) शेतकरी संघटनेचे नेते विनय हार्डीकर (पुणे) किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब (अंबाजोगाई) मार्गदर्शन करणार आहेत.
किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, डॉ. राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) आणि सुभाष कच्छवे (परभणी) यांनी पदयात्रेचे संचलन केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाहीत. कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आदी पिकांना केवळ सरकारी हस्तक्षेपामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार असल्याचे वास्तव समाजासमोर आणण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असल्याचे अमर हबीब यांनी सांगितले.
या पदयात्रेच्या निमित्ताने १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनदेखील करण्यात येणार आहे. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे (रा. चिलगव्हाण, जि. यवतमाळ) यांनी नापिकीली कंटाळून आणि कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केली होती.
या गावात सुतक पाळणे जाणार असून, राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. लाखो सुजाण नागरिक वैयक्तिक उपवास करतील तर शेकडो ठिकाणी सामूहिक उपोषण केले जाणार आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार २०१७ पासून लाखो लोक १९ मार्चला अन्नत्याग (उपवास) करत आहेत.
विविध ठिकाणी अन्नत्याग आंदोलन
अमरावती येथे पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीने उपोषण केले जाईल. वाशीम जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना ठिकठिकाणी उपोषण करीत आहे. वरुड, मोर्शी, वाटोर, पापड येथे किसानपुत्र व अन्य संघटना मिळून उपवास करीत आहेत. नागपूर, काटोल, उमठा, सावनेर, मूर्तिजापूर, आकोट आदी ठिकाणी उपोषण होणार आहे.
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील क्रांती चौकात दिवसभर उपोषण होईल. आंबाजोगाई, धारूर, दिंद्रुड, घटनांदूर, परभणी जिल्ह्यातील दैठणा,जालना जिल्ह्यातील परतूर, वाढोना, जवळाबाजार, साटंबा व लातूर जिल्ह्यातील पानगाव, उदगीर आदी ठिकाणी उपोषणाला शेतकरी बसणार आहेत.
तर कोल्हापूर जिल्ह्यात जय किसान भेटकरी संघटनेच्या वतीने पेठ वडगाव येथे उपोषण केले जाणार आहे, नाशिक जिल्ह्यात मुंगसरे, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर येथेही उपोषण होणार आहेत. या शिवाय अर्क गावात उपोषणाची तयारी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.