
अॅग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या (Agriwculture Department) माध्यमातून सेंद्रिय शेती मॉल उभारला आहे. हा मॉल कृषी (Organic Mall) विभागाच्या जवळच आहे.
या मॉलचे उद्घाटनही करण्यात आले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रिय मॉल सुरुच झाला नाही. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मॉल मृगजळ ठरल आहे.
जिल्ह्यातील सेंद्रिय उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना या मॉलचा याचा फायदा होणार आहे. या मॉलचे काम पूर्णदेखील झाले आहे.
मॉल सुरू करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कृषी विभागाने टेंडरदेखील काढण्यात आले होते, मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने हा मॉल सुरुच झाला नाही. त्यामुळे सेंद्रिय शेतकऱ्यांना या मॉलची सुरू होण्याची प्रतिक्षाच करावी लागत असल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी आत्मा विभागाने पुढाकार घेतला. आत्माने शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचे शेतकरी गट स्थापन केले. त्यानंतर सेंद्रिय पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवृत्त केले.
गटाला सेंद्रिय शेतीचे प्रमाणिकरण करण्यात आले. जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटातील पन्नास टक्क्यांपेक्षा कमी शेतकरी भाजीपाला, गूळ, हळद यासह अनेक पिकांचे उत्पादन घेत आहेत. मात्र, केवळ प्रमाणिकरण करून त्याचा काहीच फायदा नसल्याचे दिसते आहे.
कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीचे गट स्थापन झाले. त्यांना सेंद्रिय शेती कशी करायची याचे मार्गदर्शनही मिळाले. सध्या सेंद्रिय उत्पादित शेतीमालाला ठोस अशी बाजारपेठ उपलब्ध झाली नसल्याने शेतकरी बांधावरच शेतीमालाची विक्री करताहेत.
शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे तीन ते चार वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती मॉल उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मॉलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला.
त्याचे बांधकाम पूर्ण झाले. इमारत उभी राहिली आहे. यासाठी अनेक वेळा कृषी अधिकारी आणि खरेदीदार यांच्यात बैठकादेखील झाल्या. त्यातून मॉल चालवण्यासाठी निविदा देखील काढण्यात आल्या होत्या, परंतु या निविदांसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ मध्ये तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या मॉलचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. उद्घाटन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतरही मॉल सुरूच झाला नाही. त्यामुळे हा सेंद्रिय मॉल शेतकऱ्यांसाठी केवळ मृगजळच ठरत असल्याची चर्चा सुरू आहे
प्रत्यक्षात मॉल कधी सुरू होणार
आत्मा विभागाने सेंद्रिय शेतीचे गट स्थापन केले. सेंद्रिय शेतीचे प्रमाणिकरण देखील मोफत करून दिले. उद्घाटन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
परंतु हा मॉल सुरू करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसदीही घेतली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्घाटन झाले पण प्रत्यक्षात मॉल कधी सुरू होणार अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.