पुणे : संक्रांतीच्या मुहूर्तावर (Sankrant) वाटाणा, पावटा याला विशेष मागणी (Matar) असते. संक्रांत अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चार पैसे जास्त हातात पडतील या आशेने पुरंदर तालुक्यातील दिवे, सिंगापूर, भिवरी, झेंडेवाडी, काळेवाडी, बोपगाव, चांबळी, सोनोरी, वनपुरी, वाघापूर परिसरातील वाटाणा उत्पादकांची (Matar Producer) तोडणीसाठी (Matar Harvest) लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारातही वाटाणा जास्त प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे.
वाटाण्याचे उत्पादन हे मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर भागात वाटाण्याची शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मात्र पुरंदरचा वाटाणा आपल्या अप्रतिम चवीने राज्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यात सरासरी ९२९ हेक्टर एवढे वाटाण्याचे क्षेत्र आहे. त्यापैकी एक हजार ९६ हेक्टरवर यंदा पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत वाटाण्याचे उत्पादन शेतकरी घेतात. रब्बी हंगामात खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. या भागात अर्कल व गोल्डन जातीच्या वाटाण्याची पेरणी केली जाते.
पेरणी केल्यानंतर सुमारे ४५ ते ५५ दिवसांमध्ये उत्पादन सुरू होते. त्यामुळे पुरंदरच्या वाटण्याला पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत बाहेरील वाटाण्याच्या तुलनेत जास्तीचा बाजारभाव मिळत असतो.Vegetable
सध्या वाटाण्याचा हंगाम सुरू असून, या वर्षी बाहेरील राज्यातून वाटाण्याची विक्रमी आवक होत असल्याने बाजारभाव कमी आहेत. गेल्या वर्षी किलोला पन्नास रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळत होता. या वर्षी मात्र अवघा २५ ते ४० रुपये बाजारभाव मिळत आहे.
त्यामुळे उत्पादकांना फटका बसत आहे. तालुक्यात फळबागेव्यतिरिक्त वाटाण्यातून मोठी उलाढाल तालुक्यात होत असते. स्थानिक सासवड बाजारपेठेत बाहेरील पुणे, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी खरेदीसाठी गर्दी करत असतात.
यंदा वाटाण्याचे उत्पादन जरी चांगले आले असले तरी अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने तसेच बियाण्यांचे वाढते दर, कीटकनाशक फवारणी या खर्चांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
आम्ही पूर्वीपासून वाटाण्याचे उत्पादन घेतो. दर वर्षी आम्हाला वाटाण्यासाठी बऱ्यापैकी बाजारभाव मिळतो. या वर्षी बाहेरील राज्यातून प्रचंड आवक होत असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे.
- सुधीर झेंडे, वाटाणा उत्पादक शेतकरी, दिवे
सासवडच्या वाटाण्याला ग्राहकांकडून विशेष मागणी असते. म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण, दीव येथून दररोज सासवड येथे खरेदीसाठी येत असतो.
- जगन ठाकूर, व्यापारी, पेण
तालुक्यात सीताफळ, अंजिरानंतर महत्त्वाचे पीक म्हणून शेतकरी वाटाणा पिकांकडे पाहतात. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत शेतकरी पेरणी करतात. कमी कालावधीचे पीक असून, विक्रीसाठी पुणे, मुंबई मार्केट जवळ आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात अनेक शेतकरी पेरणी करतात. थंडी, निरभ्र आकाश आणि चांगला सूर्यप्रकाश असल्याने रब्बी हंगामात रोग, किडीचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होते.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.