
सोलापूर ः रासायनिक खताच्या (Chemical Fertilizers) अतिवापरामुळे आज जमीनाच कस (Soil Fertility) संपत चालला आहे. जमिनीचा कस वाढवायचा असेल, पोत सुधारायचा असेल, तर सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला (Organic Farming) प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत मोडनिंबच्या उमा महाविद्यालायातील प्रा. डॉ. प्रशांत कुंभार (Dr. Prashant Kumhar) यांनी मुंढेवाडी (ता. पंढरपूर) येथे व्यक्त केले.
सकाळ-अॅग्रोवन आणि सांगोल्यातील जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने मुंढेवाडीत शेतकऱ्यांसाठी ऊसपीक व्यवस्थापन (Sugarcane Crop Management) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॅा. कुंभार बोलत होते.
जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्सचे चेअरमन अजयसिंह इंगवले-पाटील, संचालक डॉ. प्रशांत तेली, कंपनीच्या संशोधन विभागाच्या तज्ज्ञ डॉ. रश्मी हेगडे-तेली, संजय इंगवले-पाटील, किसान ऑरगॅनिकचे गोरख ननवरे, प्रगतशील शेतकरी अरुण गायकवाड यावेळी उपस्थित होते.
डॉ. कुंभार म्हणाले, की ऊस उत्पादनात हातखंडा असणारे शेतकरी या भागात आहेत. त्यांच्या यशस्वितेबद्दल शंका नाही, पण त्यात रासायनिक खताचा अतिवापर झाल्याने जमिनी बिघडल्या आहेत.
पुढील धोका ओळखून आतापासूनच शेतकऱ्यांनी माती- पाणी परीक्षण करुन मातीतील घटक तपासून खतांचा वापर करावाच, पण त्यात सेंद्रियला प्राधान्य द्यावे.
पूर्वीच्या शेती पद्धतीत आणि आताच्या पद्धतीत फार फरक झाला आहे. आपण बदलणार नाही, तोपर्यंत हे असेच राहणार आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. हेगडे-तेली म्हणाल्या, की सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक सुपीकता सुधारून जमिनीमध्ये मोकळी हवा खेळण्यास मदत होते, मुळांना अधिकचा ऑक्सिजन मिळतो, जमिनीची जलसंधारण करण्याची क्षमता वाढते.
त्यामुळे मुळांची अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्षमता वाढून पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पन्नही वाढते. त्यामुळे शेतकऱ्याने जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन केले.
अॅग्रोवनचे क्षेत्रीय प्रतिनिधी संदेश कुलकर्णी यांनी यावेळी अॅग्रोवनच्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी कंपनीची प्रतिनिधी राहुल जानकर, सोमनाथ पोतदार, विक्रम शिंदे, पृथ्वीराज शेंडे यांनी परिश्रम घेतले.
जमिनीच्या तीन सुपिकतेवर ठेवा लक्ष...
शेतीमध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या सुपीकता असतात एक म्हणजे जैविक सुपीकता, दुसरी म्हणजे भौतिक सुपीकता आणि तिसरी सूक्ष्म द्रव्य सुपीकता या सुपीकतांमध्ये उत्तम मध्य साधता आला पाहिजे आणि या सुपीकतेवर नेमकेपणाने काम करायचे असेल, तर सेंद्रिय पद्धतीची शेती महत्त्वाची आहे, असेही डॉ. हेगडे-तेली म्हणाल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.