
Nashik News : सटाणा तालुक्यात वीजवितरण कंपनीच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
थकीत वीजबिलासाठी शेतीपंपाचा वीजपुरवठा (Electricity Supply) खंडित करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २४) माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून ‘गांधीगिरी’ केली.
तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात असून वारंवार वीजपुरवठाही खंडित केला जात आहे.
या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली;
मात्र या वेळी कार्यकारी अभियंता सतीश बोंडे हे आपल्या दालनात नसल्याने पदाधिकारी व शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांनी बोंडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी आंदोलन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीजबिलासाठी कृषीपंपांची वीजजोडणी तोडू नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही बैठकीत सक्तीची वीजबिल वसुली थांबवून कृषीपंपांची विद्युत जोडणी खंडित न करण्याच्या सूचना जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले होते;
मात्र त्यानंतरही तालुक्यात अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे.
रात्री-अपरात्री शेतीला वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागते. यातच नादुरुस्त झालेले रोहित्र बदलून दिले जात नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी या वेळी मांडल्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गजेंद्र चव्हाण, लालचंद सोनवणे, डॉ. प्रशांत सोनवणे, रवींद्र सोनवणे, प्रा. अनिल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, संजय बिरारी, अरविंद सोनवणे, विजयराज वाघ, भास्कर सोनवणे, शरद शेवाळे, राजेंद्र खानकरी, राजनसिंग चौधरी, सुमीत वाघ, सनी देवरे, अमोल पगार, विलास सोनवणे, किशोर खैरनार, अरुण सोनवणे, शैलेंद्र कापडणीस, सुयोग अहिरे, यशवंत कात्रे, किरण मोरे, लक्ष्मण सोनवणे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तर महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकणार
सोमवारपर्यंत (ता. २७) महावितरणने सक्तीची वसुली थांबवून सुरळीत वीजपुरवठा केला नाही तर मंगळवारी (ता. २८) महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा माजी आमदार संजय चव्हाण यांनी या वेळी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.