
घनसावंगी, जि. जालना : शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्याबाबत (Soybean Seed) बाजारपेठेत होणारी शेतकऱ्यांची बियाण्यातील लूट कमी व्हावी यासाठी कृषी विभागाकडून (Agriculture Department) गेल्या दोन वर्षापासून घरचे बियाणे वापरावे या दृष्टीने प्रयत्न होत आहे.
या वर्षी ऐन काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने घरी साठवता येईल असे सोयाबीन फारसे नसल्याने व पाऊसकाळ चांगला झाल्याने उपलब्ध पाण्याचा वापर उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी करता येईल अशी कल्पना कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आली.
यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जवळपास ५३० हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनची लागवड १५ जानेवारीपर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे काढणी एप्रिलपर्यंत गेली. या काळात पडलेल्या जोरदार उन्हामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीची पाणीपातळी खालावली अशा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा उतारा कमी झाला.
त्यामुळे यंदा सुरवातीपासून बियाणांसाठीची साठवणूक कशी करावी, बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी, पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्यावी, सोयाबीन पेरणीचा काळ कोणता, नेमकी काय काळजी घ्यावी यासंबंधी माहिती शेतकऱ्यांच्या गटामधून देण्यात आली. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासूनच कृषी विभागाने यासाठीचा पाठपुरावा केला.
हे बिगर मोसमी पीक घेतले जात असल्याने तापमानाचा विचार करावा लागतो. बियाणे पेरणीनंतर ४५ दिवसाच्या आत फुलोरा येतो व फूलगळ होऊ नये यासाठी वातावरणातील तापमान ३० अंश सेल्सअसपेक्षा कमी असावे लागते.
त्यामुळेच हा कालावधी कृषी विभागाने सुचवला. मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर ऊन असते. पेरणी उशिरा केली तर फुलगळीचे प्रमाण ५० टक्के पेक्षाअधिक होण्याचा धोका आहे. उन्हाळी सोयाबीनमुळे काही अंशी शेतकऱ्यांचा बियाणावरील होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
खरीप हंगामातील बियाणांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘महाबीज’नेही उन्हाळी सोयाबीनचा उपक्रम हाती घेतला आहे.आता शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. शेतकऱ्यांना बियाणाच्या बाबतीतील गुणवत्ता व वापर याबद्दल जागृती निर्माण करून उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढवला आहे. ५३० हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली आहे.
- राम रोडगे, तालुका कृषी अधिकारी घनसावंगी
उन्हाळी हंगामातील सोयाबीन हा एक नवा प्रयोग आहे. खरिपाप्रमाणे उत्पादन अधिक होत नाही. पेरणीपासून प्रत्येक टप्प्यावर नीट लक्ष दिले, पिकाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती औषध फवारणी व गरजेनुसार पिकाला लागणारे पाणी दिले तर प्रयोग यशस्वी होतो.
- नबाजी पितळे, शेतकरी पानेवाडी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.