
जालना : नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची (Organic Farming) गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. त्यामुळे लागवड (Cultivation To Harvesting) ते काढणी व ब्रँडिंग मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांचे प्रमाणीकरण करून दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) आत्माकडून दिली.
कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून शेतकरी गट यांचेसाठी विविध उपक्रम राबविले जात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.
संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष जागतिक तृण धान्य वर्ष म्हणून साजरे करणार असल्याने आत्मा च्या माध्यमातून आता जिल्ह्यात सेंद्रिय तृण धान्य ग्राहकाला मिळणार आहे. यामध्ये ज्वारी, गहू, बाजरीचा समावेश आहे.
भोकरदन तालुक्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती योजनेच्या माध्यमातून देऊळगाव ताड, चिंचोली, वालसा डावरगाव, केदारखेडा, वालसा - खालसा या गावातून 15 शेतकरी गटांनी नोंदणी प्रस्ताव आत्मा कार्यालयाकडे केली आहे.
याच शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून 300 शेतकऱ्यांची जिल्ह्यातील पहिल्या नोंदणीकृत सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीची नोंदणी होणार असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी दिली.
शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीसाठी चालना देण्यात येणार आहे.
यामुळे रसायन मुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे, राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी उद्दिष्टे या योजनेची असणार आहेत.
रासायनिक घटकांचे प्रमाण रासायनिक खते, औषधी यामुळे वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा.
- शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक आत्मा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.