
Sharad Pawar News : ‘‘पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देताना सहकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. मात्र तशी चर्चा केली असती तर मला राजीनामा देऊ दिला नसता. शुक्रवारी (ता. ५) राष्ट्रवादीच्या (NCP) राज्याबाहेरील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, हा निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,’’ अशी ग्वाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी दिली.
पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पवार यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या वेळी ते म्हणाले, ‘‘माझ्या राजीनाम्यावरून तीव्र भावना आहेत. मी ते पाहतोय. राज्यभरातून कार्यकर्ते येथे आले आहेत. ते आपल्या भूमिकेबाबात आग्रही आहात. मात्र मी पक्षाच्या भवितव्यासाठी निर्णय घेतला आहे.
भविष्यकाळात पक्षाचे काम कसे चालावे, नवीन नेतृत्वाने काम करावे, अशी यामागील भूमिका होती. हा निर्णय घेताना सहकाऱ्यांसोबत विचारविनिमय करणे गरजेचे असते.
मी त्याबाबतही विचार केला. मी जर चर्चा केली असती, तर मला कधीच होकार दिला नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. पण मी तसे केलेले नाही. त्यामागील हेतू मी तुम्हाला सांगितला आहे. माझ्या निर्णयानंतर अनेक सहकारी येत आहेत. महाराष्ट्राबाहेरील लोक येत आहेत.
शुक्रवारी (ता.५) संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याशी बैठक होईल. तुम्हा सर्वांच्या भावना विचारात घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत, इतकेच आता सांगतो. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही.’
महाविकास आघाडीला तडा जाणार नाही : ठाकरे
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही,’’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, ‘‘मला वाटते की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावे, हे ठरविण्याचा अधिकार असतो. महाविकास आघाडीला कुठेही तडा जाईल, अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडेल असे मला वाटत नाही,’’ असेही ठाकरे म्हणाले.
पवार निर्णयावर ठाम : जयंत पाटील
‘‘शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. हा निर्णय घेऊ नये यासाठी त्यांना अनेकांनी आग्रह केला आहे. २०२४ च्या होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, असे कार्यकर्ते, पदाधिकारी देशभरातील प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी पवार यांना सुचविले आहे.
अध्यक्षपदासाठी माझे नाव काहींनी सुचविले असले, तरी मी महाराष्ट्र सोडून जाणार नाही. माझा दुसऱ्या राज्यांत संपर्क नाही. लोकसभा किंवा राज्यसभेतील नेत्यांचा संपर्क असतो. पवार यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे पवार यांनीच अध्यक्ष राहावे, असे आम्हाला वाटते,’’ असेही पाटील म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.