
औरंगाबाद : ‘‘चंद्रपूर येथील इराई जलाशयात प्रस्तावित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या (Floating Solar Project) धर्तीवर मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातही तसा सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Energy Project) उभारण्याची चाचपणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांनी केल्याची माहिती ‘महावितरण’ (Mahavitaran) कडून देण्यात आली.
महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे बुधवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ही सूचना केली.फडणवीस यांनी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला.
फडणवीस म्हणाले, ‘‘खात्रीशीर वीजनिर्मितीसाठी पंप स्टोअरेज जलप्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावर काम करावे.
जुने सबक्रिटिकल संच टप्प्याटप्प्याने बंद करून तिथे नव्या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक सुपर क्रिटिकल संचाची उभारणी करावी. वीज केंद्रातील पर्यावरण व सुरक्षितता याबाबत दक्ष राहून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक गुंतवणूकदारांसोबत प्राधान्याने चर्चा कराव्यात.’’
‘‘केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांची क्रमवारी जाहीर केली आहे, त्यात आपण कमी पडलो आहोत. या क्रमावारीत सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. महावितरणने सुरूवातीला शहरी भागात स्मार्ट मिटर बसवावेत. त्यात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामिण भागातही स्मार्ट मिटर बसवावेत. या शिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत.’’
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे कंपन्यांची माहिती सादर केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.