पूर, भूस्खलनामुळे आसाममध्ये १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

करीमगंज जिल्ह्यातील पूरस्थिती बिकट; सव्वा लाख लोक बाधित
Assam Flood
Assam FloodAgrowon

करीमगंज, आसाम (वृत्तसंस्था) : आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी (ता. २०) सांगितले, की राज्यातील नागाव आणि मोरीगाव जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक गावे अद्याप पुराच्या पाण्याखाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) सांगितले, की आसाममध्ये आलेल्या पुरामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण बेपत्ता आहेत. सध्याच्या पूर आणि भूस्खलनात गेल्या २४ तासांत १ लाख १३ हजार ४८५.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ३६४ घरांचे (१२६ पूर्ण आणि २३८ अंशतः नुकसान) नुकसान झाले आहे.

आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील पूरस्थिती बिकट झाली असून, कुशियारा, लोंगाई आणि सिंगला नद्यांच्या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १.३४ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ८२ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२ जिल्ह्यांतील १२५ महसूल मंडळांतर्गत ५ हजार ४२४ गावे पुराच्या पाण्याखाली आहेत. खालच्या आसाममधील बारपेटा जिल्ह्यात १२.३० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर दारंगमध्ये ४.६९ लाख, नागावमध्ये ४.४० लाख, बजालीमध्ये ३.३८ लाख, धुबरीमध्ये २.९१ लाख, कामरूपमध्ये २.८२ लाख, गोलपारामध्ये २.८० लाख लोक बाधित झाले आहेत. कचरमध्ये २.०७ लाख, नलबारीमध्ये १.८४ लाख, दक्षिण सलमारामध्ये १.५१ लाख, बोंगाईगावमध्ये १.४६ लाख आणि करीमगंज जिल्ह्यात १.३४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या प्रशासनाने ८१० मदत शिबिरे आणि ६१५ मदत वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. जिथे सध्या सुमारे २.३२ लाख लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता करीमगंज प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्था २३ जूनपर्यंत बंद ठेवल्या आहेत. भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी यांनी कचार जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांसह पूरग्रस्त भागात बचाव कार्य केले. बचाव पथकांनी सोमवारी (ता. २०) सिलचर आणि कचार जिल्ह्यांतील ३ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, अशी माहिती कचार जिल्हा प्रशासनाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com