
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांची भेट घेत आयात-निर्यात धोरणात बदलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.
सध्या सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साडेपाच हजारांवर जायला तयार नाही. कापसाचा दरही दीड हजारांनी खाली आला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी तुपकर यांनी नागपुरात उपरोक्त नेत्यांच्या भेटी घेतल्या. गेल्या महिन्यात त्यांनी या विषयावर बुलडाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विराट मोर्चा काढला होता. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्यासाठी शेतकऱ्यांसह मुंबई गाठली होती. त्यावेळी राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकार केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढेल असा शब्द दिला होता. परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चाच केली नाही.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशीही चर्चा झाली होती. पण यासंदर्भात अजून कोणताही ठोस निर्णय आलेला नाही. त्यामुळे तुपकरांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची गुरुवारी (ता. २९) भेट घेऊन केंद्राकडे सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी आयात निर्यात धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा असा इशारा दिला.
शेतीला संरक्षणाची मुनगंटीवारांकडे मागणी
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेट घेत वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण मिळावे यासाठी शेतीला कुंपण करण्याची योजना तत्काळ आणावी, अशी मागणी तुपकरांनी केली. यासंदर्भात शेतीला कुंपण करण्याची योजना लवकरात-लवकर आणण्याबाबत मुनगंटीवारांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.