
पुणेः मनडूस चक्रीवादळाच्या (Mandoos) प्रभावामुळे राज्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. पावसाला पोषक स्थिती असल्याने हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मनडूस चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर केरळलगत चक्राकार वारे वाहत आहेत. हे चक्राकार वारे उद्या अरबी समुद्रात जाताच पुन्हा तीव्र होऊन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. ती प्रणाली किनाऱ्यापासून दूर जाणार आहे.
तसेच दक्षिण अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार आहे. तर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील किनारी आंध्र प्रदेश, रायलसिमान, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावासाची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला पोषक वातावरण झाले. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दोन ही स्थिती कायम राहणार असून नाशिक, नगर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील ही पावसाची स्थिती निवळल्यानंतर किमान तापमान दोन ते चार अंशाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा वाढू शकतो.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. त्यामुळे द्राक्षसह फळबागा, कापूस, तूर आणि इतर पिके संकटात आली होती. पावसामुळे शेतात फुटलेला कापूस ओला होण्याच धोका होता. तसेच काहीजणांनी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना धास्ती बसली होती. पण पाऊस झाला नाही. तसेच हवामान विभागानेही जोरदार पावसाचा अंदाज दिलेला नव्हता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.