
सिंधुदुर्गनगरी ः ऊस गाळप हंगाम सुरू होऊन तब्बल ७५ दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी आतापर्यंत जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार ५०० टन उसाची तोडणी झाली आहे. नादुरुस्त करूळ घाटरस्त्यामुळे ट्रकचालक जिल्ह्यात येण्यास उत्सुक नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपासाठी नेला जातो. या उसाची वाहतूक करूळ घाटमार्गे केली जाते. परंतु हा घाटमार्ग गेल्यावर्षीप्रमाणे नादुरुस्त आहे. घाटरस्त्यात खड्डेच खड्डे असल्यामुळे ऊस वाहतूक करणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे ट्रकचालक जिल्ह्यातील ऊस वाहतूक करण्यास उत्सुक नाहीत. परिणामी जिल्ह्यात अवघे दहा तोडणी समूह कार्यरत आहेत. नादुरुस्त करूळ घाटरस्त्यामुळे भुईबावडा घाटमार्गे ऊस वाहतूक करावी लागत असल्यामुळे दहा ते बारा किलोमीटर अंतर वाढत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची रक्कम ट्रकचालकांना द्यावी लागते. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन ७५ दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. या कालावधीत अवघी ४ हजार ५०० टन उसाची तोडणी झाली आहे. अतिशय धिम्या गतीने तोडणी सुरू असून हीच गती कायम राहिली तर एप्रिलअखेरपर्यंत तोडणी होणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
करूळ घाटरस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम काही अंशी करण्यात आले आहे. या रस्त्यांच्या नूतनीकरणाची निविदा प्रकिया सुरू असून ती पूर्ण होताच या रस्त्याचे सिलकोट, कारपेट करण्यात येणार आहे. या महिनाअखेरीपर्यंत निवीदा प्रकिया पूर्ण होईल.
- अतुल शिवनिवार,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,
गेल्यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, परंतु यावर्षीदेखील शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ करूळ घाट दुरुस्त करावा, अशी आमची मागणी आहे.
- किशोर जैतापकर,
ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.