
Nanded News नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या (ता. १६) गारपीट (Hailstorm) व वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे (Crop Damage) नुकसान झाले आहे. यात जनावरांचा मृत्यू (animal Death) झाला आहे. यासोबतच घरांवरील पत्रे उडून गेली आहेत.
शेतीतील सर्वच उभी पिके भुईसपाट झाली आहेत, अशावेळी नुकसानग्रस्तांच्या पिकांचे पंचनामे करून प्रति हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची तत्काळ मदत (Compensation) द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या समवेत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नुकसानीची माहिती मिळताच अशोक चव्हाण मुंबईहून नांदेड येथे आले.
त्यानंतर त्यांनी पाटणूर, बारड, पांढरवाडी, डोंगरगाव, शेंबोली, निवघा, इजळी, मुगट, शंखतीर्थ, आमदुरा, वासरी या गावांचा दौरा केला. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या समवेत नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, संतोष पांडागळे, नीलेश देशमुख, किशोर देशमुख उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी पीक नुकसानीची वास्तववादी माहिती मिळण्यासाठी ड्रोनद्वारे पाहणी करण्याची प्रशासनास सूचना केली.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर, लोहा, मुखेड, हदगाव या तालुक्यातील साडेसात हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकरा हजार नऊ शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ पोहोंचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पाऊस व वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.
या घरांना एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारी ९५ हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. महाविरणच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक घेऊन वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा.
शेडनेट व पॉली हाऊस यावर लावण्यात आलेली नेट व पॉलीफील्मचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना विशेष बाब म्हणून तत्काळ मदत करावी. दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्यात यावी. हळद उत्पादक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करावी असेही त्यांनी सांगितले.
‘पिकविमा नसलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजारांची मदत द्या’
काही शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता, तर काहींनी आपल्या पिकांचा विमा काढला नाही. त्यासोबतच टरबूज, खरबूज, हळद, भाजीपाला या पिकांना पीकविम्याचे कवच नसते व अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे पीकविमा असेल किंवा नसेल तसेच पीकविम्याचे ज्या पिकांना कवच नाही अशा सर्वच नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान २५ हजारांची मदत देण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.