
नगर ः शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी कृषी विभागामार्फत (Agriculture Department) राबवण्यात येणाऱ्या धान्य व फळे महोत्सवाचा (Grain Festival) उपक्रम तीन वर्षांत झाला नाही. यंदा हा उपक्रम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेममार्फत होणाऱ्या महिला बचत गटांनी (Women Self Help Group) तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन व विक्री आणि कृषी विभागाचा फळे व धान्य महोत्सव एकत्रित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्यासोबत याविषयी कृषी व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमाल, फळाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना सातत्याने राबवण्याचा प्रयत्न झाला आहे. नगरचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या संकल्पनेतून २००६ मध्ये पहिल्यांदा नगर येथे कृषी महोत्सवाची संकल्पना राबवली गेली.
त्यानंतर कृषी विभागाने राज्यभर राबवल्या गेलेल्या या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षात मात्र कोरोना व अन्य कारणाने महोत्सव झाला नाही. यंदा हा महोत्सव व्हावा यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा महोत्सव डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्रीसाठी साईज्योती महोत्सव राबवला जातो.
हा महोत्सवही गेल्या तीन वर्षापासून झाला नाही. यंदा हे दोन्ही महोत्सव एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी नुकतीच बैठक झाली असून महोत्सव करण्याबाबत निश्चित झाले आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर धान्य, फळे महोत्सव व साईज्योती प्रदर्शन होणार हे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांशी होतो संवाद
धान्य, फळे, महोत्सवात सहभाह घेणारे जिल्हाभरातील शेतकरी असतात. विशेष करुन अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ, जामखेडची मालदांडी ज्वारी, सेंद्रीय गुळ व अन्य साहित्याची खरेदी होते. साईज्योती प्रदर्शनात सहभागी असलेल्या बहुतांश महिला शेतकरी कुटुंबातील असतात. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचा शेतकरी, कष्टकरी महिलांशी संवाद होतो. साधारण चार-पाच दिवसांच्या या मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद होतो आणि त्यातून नवीन ग्राहक थेट जोडला जात असल्याचा अनुभव आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.