Hapus Mango : उन्हाच्या कडाक्यात होरपळतोय हापूस
Hapus Mango Season रत्नागिरी ः गेल्या चार दिवसांत उन्हाचा पारा (Heat) वाढल्यामुळे कडक ऊन जाणवत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तयार झालेला हापूस उन्हाच्या चटक्याने भाजून (Hapus Mango) गळू लागला आहे.
या उन्हाचा मोहोराच्या (mango Blossom) सेटिंगवर परिणाम होत असल्यामुळे भविष्यातील उत्पादनावर थोडा परिणाम होईल, अशी भीती आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यात अधिक पेट्या बाजार समितीमध्ये आल्याचे वाशीतील व्यावसायिक संजय पानसरे यांनी सांगितले. तसेच बागायतदारांनी वातावरणातील बदलांचा अंदाज घेऊन परिपक्व फळे बाजारात आणण्यावर भर द्यावा.
तरच बाजारातील दर्जेदार आंब्याचा दर स्थिर राहील. यंदा उत्पादन कमी राहील, असा अंदाज आहे. सध्या बाजारात आंबा पेटीचा दर ३५०० ते ८००० रुपये इतका आहे.
जानेवारी महिन्यात सलग पंधरा दिवस थंडी राहिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यास सुरुवात झाली. आरंभीला मोहोर कमी राहिल्याने पहिल्या टप्प्यातील उत्पादन १० टक्के आहे.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणाऱ्या आंब्याच्या पेट्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमाण हे सहा ते सात टक्के आहे.
वाशी बाजार समितीत चार ते सात डझन पेटीचा दर सुमारे साडेतीन हजार ते आठ हजार रुपये आहे. गेल्या दोन दिवसांत एक हजारहून अधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून वाशीत पोचल्या.
कडाक्याची थंडी ओसरल्यानंतर आंब्याची आवक हळूहळू वेगाने वाढू लागली आहे. मागील तीन ते चार दिवसात उन्हाचा तापही वाढला आहे. उन्हामुळे फळाला लाली येत असून तो बागायतदारांकडून तत्काळ काढला जातो.
रत्नागिरीतील खासगी बागायतदारांनी कातळावरील परिसरात उभारलेल्या तापमापकात ३८ अंशावर पारा चढल्याचे सांगितले. दुपारच्या सुमारास जाणवणाऱ्या उन्हामुळे आवळ्याच्या आकाराहून थोडी मोठी कैरी गळून जाते.
त्यामुळे सुरवातीच्या उत्पादनात थोडी घट होईल, असे बागायतदारांचे मत आहे. तयार झालेला आंबा काढण्यासाठी बागायतदारांकडून घाई केली जात असून पुढील महिन्यात फळांची आवक दुप्पट होणार आहे.
उन्हामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे. मात्र मोहोरातील सेटींगचे प्रमाण कमी राहील असा अंदाज आहे. तसेच थ्रिप्सचे संकट अजूनही टळलेले नाही.
अनेक ठिकाणी थ्रिप्सला आळा घालणे बागायतदारांना शक्य झालेले नाही. याबाबत उन्हामुळे अनेक ठिकाणी भाजलेली झाडावरील फळं गळून गेली आहेत.
यंदा सुरुवातीला आंबा कमी राहणार आहे. महाशिवरात्रीचे तीन दिवस उन्हाचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे आंबा भाजला असून आवळ्यापेक्षा लहान कैरी पिवळी पडून गळून जात आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार
दररोज हजार ते बाराशे पेट्या पाठवणी
दरम्यान, मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये देवगड, रत्नागिरी मधून हापूसच्या दररोज हजार ते बाराशे पेट्या दाखल होत आहेत. त्यामध्ये रत्नागिरी हापूसचा टक्का अल्पच म्हणजेच सर्वसाधारण सात ते आठ टक्के आहे.
देवगडमधून अधिक आंब्याच्या पेट्या पाठविण्यात येत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे बागायतदारांकडून काढणी वेगाने केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गुणवत्तेनुसार ठरतोय दर
आंब्याची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार ठरवली जाते. सामान्य आंब्याची किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये प्रति पेटी आहे, तर उच्च दर्जाच्या आंब्याची प्रति पेटी सुमारे ८ हजार रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजाराने दर कमी असल्याचे अनेक व्यापारी सांगत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.