औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासात काही ठिकाणी झालेला तुरळक पाऊस (Rain Update Aurangabad) वगळता पावसाने उसंतच घेतली होती. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात मात्र आठ मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यात दमदार पाऊस झाला.
मराठवाड्यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पावसाने शेती पिकांची दाणादाण करणे सुरू केले आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळात हलका, मध्यम, जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील एका मंडळासह, कन्नडमधील तीन, सोयगावमधील तीन व फुलंब्रीतील एक मंडळ मिळून आठ मंडळात अतिवृष्टी झाली. फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यातही सर्वाधिक जोर राहिलेल्या सोयगाव तालुक्यात तर सरासरी ८२ मिलिमीटर पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातील ४९ मंडळापैकी ४० मंडळात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. इतर तालुक्यात अपवाद वगळता तुरळक, हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी १६ मंडळात झालेला तुरळक पाऊस वगळता इतरत्र पावसाचा थेंबही बरसला नाही. लातूर जिल्ह्यात पावसाने पूर्णतः उसंतच घेतली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा मंडळात झालेला तुरळक पाऊस वगळता इतर मंडळात पावसाने उसंतच घेतली.
करंजखेडा परिसरात काही गावांचा संपर्क तुटला
पिशोर : पिशोर परिसरात जोरदार व करंजखेडा परिसरात रविवारी (ता. १८) संध्याकाळी व त्यांनतर रात्री उशिरा अतिजोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले आहे. यामुळे या परिसरातील आठ ते नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावातील गावकऱ्यांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे. सोबतच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पिशोर परिसरातील अंजना, खडकी, इसम, कवडा नाला, कोळंबी, काटशेवरी नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले. कोळंबी, तांडा-भारंबा, भारंबावाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव, भिलदरी यासह अनेक गावांचा पिशोर या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला. त्यामुळे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध काढण्यासाठी पूर ओसरण्याची वाट बघत थांबावे लागले.
थोडाफार पूर ओसरल्यानंतर दोर बांधून पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. करंजखेडा, नागपूर या गावांचा साखरवेल, पिशोर या गावांशी संपर्क तुटला होता. अनेक पूल या पाण्यात खचले असून त्यावरून अवजड वाहने जाणे बंद करावे लागणार आहे. अनेक भागात शेतात पाणी तुंबले आहे. आधीच पावसामुळे पिकं पिवळी पडत असताना आता पिकं वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शिवना टाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू
गल्लेबोरगाव : कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प सोमवारी (ता. १९) सकाळी शंभर टक्के भरला. धरणाचे पाच पैकी एक दरवाजा १० सेमी उघडला असून त्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणी शिवना नदी पात्रात सोडण्यास सुरवात झालीआहे.शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या वतीने देण्यात आला आहे.
अतिवृष्टी झालेली मंडळ
(पाऊस मिलिमीटरमध्ये)
औरंगाबाद जिल्हा
चौका ८२.३
सोयगाव ७८.८
सावलदबारा ७१.३
बनोटी ९७.३
फुलंब्री ८२.३
कन्नड ६८.३
चापानेर ६८.३
करंजखेडा ९७.३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.