अतिवृष्टीचा ( Heavy rainfall) फटका पिकांना बसला आहे. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे काम सुरू झाले आहेत. साधारणतः अडीचशे हेक्टरपर्यंत शेतीचे नुकसान झाले असून त्यात सोयाबीन, बाजरी व घेवडा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी नवीन निकषाप्रमाणे भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. पावसाळ्याचा अखेरचा टप्पा सुरू असून, अनेक भागांत अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. पण, पिकांची परिस्थिती चांगली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फलटण, जावळी, महाबळेश्वर व वाई तालुक्यांना फटका बसला आहे. सर्वाधिक फटका फलटण (Phaltan) तालुक्याला बसला आहे. सोयाबीन, बाजरी व घेवडा पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतांत पाणी तुंबून राहिले आहे. फलटण तालुक्यात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरिपातील ही महत्त्वाची नगदी पिके असल्याने त्यांचेच नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या महसूल व कृषी विभाग या नुकसानीचे पंचनामे करत असून गावागावांत जाऊन कर्मचारी नुकसानीची माहिती घेत आहेत. आतापर्यंत चार तालुक्यांत अडीचशे हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन व बाजरीचे आहे. तसेच घेवडा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने नुकसानीची आकडेवारी वाढण्याची भीती आहे. आतापर्यंत शेतीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग व महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचे आकडे वाढणार आहेत. शेतीमध्ये सोयाबीन, बाजरी व घेवड्याचे मोठे नुकसान आहे. याचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला जाईल.
- विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.