
Nashik News : ‘‘ग्रामीण भागात मघमाशीपालानातून रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. या कृषिपूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते. पिकांच्या परागीभवन व अन्नसाखळीमध्ये मधमाश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भौगोलिकदृष्ट्या मधुमक्षिका पालनासाठी महाराष्ट्रातील वातावरण उपयुक्त आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामुळे शासनाचे पाठबळ घेऊन मधव्यवसाय ताकदीने उभे व्हावेत,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले.
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे आणि ग्रीनझोन ॲग्रोकेम (नाशिक) संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद होत आहे. त्यात शनिवारी (ता. २०) राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत ‘मधमाशी पालनाची महाराष्ट्रातील सद्यःस्थिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनेतून उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. बी. पवार होते. या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाट, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तनिष्क ग्रामीण सेवा संघाचे (उत्तरप्रदेश) सचिव संजीव तोमर, मधमाशी उद्योजक मदन शर्मा (चंडीगड), सुभाष कंबोज (हरियाना), ‘ग्रीनझोन एग्रोकेम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. मोते म्हणाले, ‘‘शासन पाठबळ देईल; मात्र व्यवसाय तुम्हाला करावा लागेल. त्याचा शास्त्रीय अभ्यास व्हावा. मधमाशीपालनाला लाभदायक असा औद्योगिक आयाम प्राप्त व्हावा, यासाठी राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ विशेष प्रयत्न करत आहे.
याद्वारे मधुपालकांच्या प्रकल्पांना विशिष्ट अटींच्या पूर्ततेनंतर अर्थसाह्य, अनुदान दिले जाते.’’ बसवंत उद्यान स्वयंस्फूर्त पथदर्शक प्रकल्प म्हणून अतिशय उपयुक्त ठरेल, असे कौतुकही त्यांनी केले.
...यांचा झाला सन्मान
मधमाशी पालन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था श्रेणीतील मधुक्रांती पुरस्कार सुनील भालेराव यांच्या 'शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाउंडेशन'ला तर मधमाशीपालन क्षेत्रामधील व्यक्ती श्रेणीतील पुरस्कार कणेरी मठ, (कोल्हापूर) येथील दयावान पाटील यांना देण्यात आला.
तसेच ऋषिकेश औताडे (नगर), योगिता इंगळे (अमरावती), तेजस लिमकर (धाराशिव, उस्मानाबाद), ज्योत्स्ना देसाई (कोल्हापूर), राजू मंडळ(पालघर) या मधमाशी उद्योजकांना गौरविण्यात आले.
‘मधमाशी संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्न’
‘‘भाजीपाला व फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहोत. मात्र त्यावर दोन टक्क्यांपेक्षा जास्त प्रक्रिया होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण झाली की नुकसान सर्वप्रथम शेतीमालाचे होते.
म्हणूनच आता शेतकऱ्यांना समतोल व शाश्वत शेतीकडे वळावेच लागेल. आपण सर्वांनीच मधमाशीचे महत्त्व जाणून तिच्या संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्न करावेत’’, असे आवाहन संजय पवार यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.