
Honey Village पुणे ः मधाचे गाव ही संकल्पना लोकाभिमुख होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये (Budget 2023) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी राज्यात ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. याबद्दल मनपूर्वक आभार.
राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या (Khadi Gramodyog Board) संकल्पनेतून मधाचे गाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मांघरच्या धर्तीवर अशी अनेक गावे निर्माण करण्याचा मंडळाचा मानस आहे, अशी माहिती खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मधमाश्यापालन) बिपिन जगताप यांनी दिली.
राज्यातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघरची (ता. महाबळेश्वर) ओळख निर्माण झाली आहे. या गावचा प्रारंभ १६ मे २०२२ ला करण्यात आला होता. हे गाव मधाचे गाव म्हणून निर्माण व्हावे यासाठी गावातील लोकांना प्रशिक्षित करण्यात आले. मधपेट्यांचे वाटप केले. मधाची संपूर्ण प्रक्रिया लोकांना पाहता यावी यासाठी गावातच मधुबन उभारण्यात आले आहे.
गावातील पडून असलेल्या इमारतीला पुन्हा रंगरंगोटी दुरुस्त करून वापरात आणले गेले आहे. या इमारतीत माहिती दालन आणि विक्री केंद्र सुरू करण्यात आले.
महाबळेश्वरला येणारा पर्यटक गावात येईल, अशा पद्धतीने गावाचे सुशोभीकरण करण्यात आले. मधाचे गाव होण्यापूर्वी या गावातील मधमाश्यापालन करणारे मधपाळ मधाचा व्यवसाय केवळ शेतीला जोडधंदा म्हणून करीत होते.
गावच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास साठ टक्के लोक या व्यवसाय होते मात्र आज मधाचे गाव प्रारंभ झाल्यानंतर गावातील नव्वद टक्के लोकांचा हा प्रमुख व्यवसाय झाला आहे.
मागील दहा महिन्यांत या गावाला साठ ते सत्तर हजार पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे गावातील सर्व शेती उत्पादने चांगल्या किमतीने विक्री करण्यात लोक यशस्वी झाले आहेत.
लोकांना मधमाशी व मध संकलनाची प्रक्रिया पाहता यावी यासाठी गावात सामूहिक मधुबनदेखील उभारण्यात आले आहे.
गावाने स्वतःचा मधाचा ब्रँड तयार केला असून येणाऱ्या पर्यटकांना त्यामुळे शुद्ध मध मिळत आहे. गावातील महिला बचत गटाच्या वस्तूंना गावातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे महिलांचे व्यवसाय यशस्वी होत आहेत.
संपूर्ण गाव मधमाश्यापालन करीत असल्याने अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उप उत्पादनापासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण खादी व ग्रामोद्योग मंडळाने या ग्रामस्थांना दिले आहे.
लोकांना कायमचा रोजगार
मधाचे गाव ही संकल्पना गावांना समृद्ध आणि सुजलाम् करणारी आहे. लोकांना कायमचा रोजगार देणारी आहे.
यासाठी पहिल्या टप्प्यात अमरावती, पालघर कोल्हापूर, चंद्रपूर, नांदेड, रत्नागिरी या जिल्ह्यांतील गावांचा समावेश मधाच्या गाव म्हणून करण्यात येणार आहे.
गावांची निवडदेखील भोगौलिक परिस्थिती पाहून करण्यात येईल जेणेकरून या गावांना सक्षम आणि समृद्ध करणे सोईचे होईल.
नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वपूर्ण
राज्यातील टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांत किमान एक मधाचे गाव व्हावे यासाठीच प्रयत्न सुरू राहील. मागील वर्षात राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मांघर (ता. महाबळेश्वर) हे मधाचे गाव करण्यासाठीची संकल्पना राबविली गेली आणि आज ती लोकप्रियदेखील झाली आहे.
गावातील मधमाशीचे वास्तव्य गावाला आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मधाचे गाव ही लोकचळवळ ठरली तर गावातील शेतीमध्ये मोठा बदल दिसून येईल. मधाचे गाव नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीसाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.