
Water Conclave पुणे ः भारतासह जगातील काही नद्या कोरड्या (River In India) पडत आहेत. त्यामुळे आता आपण वेळेत जागे होण्याची गरज आहे. अन्यथा, भविष्यात नद्या नव्हे; तर मानवी संस्कृती (Human Culture) कोरडीठाक पडेल, असा स्पष्ट इशारा जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांना दिला.
‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जल व्यवस्थापन’ या विषयावरील जल महापरिषदेत (वॉटर कॉनक्लेव्ह) झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
श्री. सिंह यांनी लिहिलेल्या ‘सभ्यता की सुखती सरिताएँ’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘द सत्संग फाउंडेशन’चे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री एम. यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे चेअरमन अभिजित पवार होते.
‘‘नद्यांच्या अभ्यासासाठी या दशकात १२७ देशांचा मी अभ्यास दौरा केला. त्यानंतर नद्यांची वस्तुस्थिती सांगणारे हे पुस्तक लिहिले आहे.
नदी आणि मानवी संस्कृती या दोघांचाही प्रवास परस्परपूरक राहिला आहे. मानवी आरोग्य हे पूर्णतः नद्यांशी जोडले गेलेले आहे.
त्यामुळे नदी आजारी असल्यास संस्कृती आजारी पडते. आपण वेळीच उपाय न केल्यास आजारी नद्या कोरड्या पडतील आणि आपली संस्कृतीदेखील संपेल,’’ असे श्री. सिंह म्हणाले.
या पुस्तकाचे स्वागत करीत श्री एम. म्हणाले, की राजेंद्र सिंह यांनी आपले अनुभव लिहिले आहेत. अनुभवातूनच आपण शिकत असतो. प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे आणि नदी संवर्धनासाठी काम करायला हवे.
प्रकाशनानंतर अधिक माहिती देताना श्री. सिंह यांनी सांगितले, की नद्या खरे तर जीवनसरिता आहेत. त्यांची सध्याची स्थिती वाईट आहे.
नद्यांना पूर्वीसारखेच वैभव मिळावे आणि त्यांचे प्रवाह नैसर्गिकरीत्या जपले जावेत, यासाठी मी हा लेखनप्रपंच केला आहे. जगातील २६ नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत मी यात्रा केल्या. त्यात गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू यांचाही समावेश आहे.
कॅनडापासून ते न्यू यॉर्कपर्यंत २५० किलोमीटरपर्यंत हडसन नदी प्रवास करते. ओटोवा नदीचे संवर्धन, टर्कीमधून सीरियाकडे जाणारी युफ्रेटिस नदी, आफ्रिकेतील नाइल व इस्राईलच्या जॉर्डन नदी याचा आँखो देखा हाल पुस्तकात मांडला आहे.’’
नद्यांना आईचा दर्जा द्या
‘‘अनेक आजार बरी करणारी पूर्वीची गंगा नदी आता स्वतःच अतिप्रदुषित झाली आहे. देशात पूर्वी नद्यांना आईचा दर्जा होता. त्यांचे सर्वत्र पूजन केले जात होते. मात्र, नद्यांचे ते वैभव गेले.
सध्या जगात फक्त न्यूझीलंडच्या वांगानुई नदीला तेथे संविधानात स्थान आहे. तसे स्थान आपल्या देशातील नद्यांनाही दिले जावे,’’ अशी अपेक्षा जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
‘‘नमामी गंगेमुळे सरकारचे ३६ हजार कोटी वाहून गेले; मात्र गंगा आहे त्यापेक्षा २० टक्के जास्त घाण झाली आहे. मी हे सांगताना अजिबात घाबरत नाही. कारण वेळीच लक्ष न दिल्यास येत्या दशकातच गंगेचा मृत्यू होईल,’’ असा इशारा त्यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.