
विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Amravati Farmer Protest News अमरावती : तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळ नुकसानीच्या मदतीपासून (Crop Damage Compensation) वंचित ठेवल्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रविवार (ता.५) पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. मात्र तिवसा तालुक्यातील वरखेड मंडलातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही.
पर्जन्यमान यंत्र खराब झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे वरखेड मंडलातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले.
आतापर्यंत अनेकदा आंदोलन करून सुद्धा न्याय मिळाला नाही. तसेच विमा धारक शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा, तालुक्यातील संत्रा उत्पादकांना मदत मिळावी, यासाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केला
आंदोलनात माजी सरपंच मुकुंद पुनसे, प्रदीप बोके, विलास हांडे, दीपक पावडे, निवृत्ती मुकरदम, रामभाऊ कडू , विवेक काळे, साहेबराव लवनकर, किशोर गोरडे, जानराव लाधे, संदीप थोटे, विशाल राऊत, राहुल पखाले, विनोद मसलदी आदी सहभागी झाले.
आंदोलनाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पारधी, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे यांनी भेट दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.