
ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : जिल्ह्यातील विविध भागांत हुरडा पार्ट्यांनी (Hurda Party ) जोर धरला आहे. जिल्ह्यात उत्पादित हुरड्याची नगर, पुणे सह राज्यातील विविध भागांतही विक्री सुरू झाली आहे. कच्चा हुरडा अनेकांच्या हातांना काम देतो आहे.
सध्या रब्बी ज्वारीचे पीक जोमात आहे. त्यातच नाताळाची शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे विविध कृषी पर्यटन केंद्रांत अनेक कुटुंबं हुरड्याचा बेत आखत आहेत. त्यामुळे हुरडा पार्ट्यांना बहर आला आहे. गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापूर ही दोन गावे हुरडा उत्पादक म्हणून ओळखली जातात. या ठिकाणचा हुरडा राज्यातील इतर जिल्ह्यांसोबतच पार दिल्लीपर्यंत जातो. नगर मार्गावर जवळपास ३० ते ४० उत्पादक शेतकरी चवदार हुरडा ग्राहकांना विकतात.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील विविध ठिकाणी हुरडा पार्ट्यांची परंपरा आहे. अनेकांनी या हुरडा पार्ट्यांना व्यावसायिक स्वरूपही दिल्याचे बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळते. गेल्या आठ ते दहा वर्षांत अनेक ठिकाणच्या पारंपरिक ज्वारीच्या पट्ट्यात ज्वारी पिकाच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी घटत चालले आहे.
या पीक बदलाचा परिणाम हुरड्याचा ट्रेंड बदलण्यावरही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेणे बंद केले असले तरी हुरड्यापुरती ज्वारी उत्पादन किंवा इतर ठिकाणांहून आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे अनेक कृषी पर्यटन केंद्रे परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरड्याचे नियोजन करतात. परंपरेला आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे.
‘सुरती, गुळभेंडी’ला पसंती
सुरती व गुळभेंडी या दोन प्रकारच्या हुरड्याला ग्राहकांची विशेष मागणी आहे. गरमागरम हुरडा, गूळ, लसणाच्या चटणीसोबत चाखत रंगलेल्या गप्पांच्या मैफली, असे चित्र अनेक भागात दिसते आहे. शहरातील पाहुणे आणि मित्रमंडळींसाठी हुरडा आणि हावळ्याचा खास बेत आखून शेतकऱ्यांकडे ठिकठिकाणी हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.
...असा तयार होतो हुरडा
ज्वारीच्या कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होऊन भरू लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ज्वारीच्या ताटावरून कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते. हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते. वाऱ्यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत राहावेत म्हणून शेतातच लहान खड्डा खणून त्यात गोवऱ्या पेटविल्या जातात. जाळ संपल्यानंतर कणसे निखाऱ्यात ठेवण्यात येतात. चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगली खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.