औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharip Season) उद्दिष्टानुसार पीककर्ज पुरवठा करण्यात सर्वच जिल्ह्यांना अपयश आले आहे. त्यामुळे वेळेत व हंगामाआधी पीककर्ज (Crop Loan Marathwada) पुरवठा करण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली आहे.
असे असले तरी सर्वाधिक कर्जपुरवठा करत औरंगाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांना ४६१८ कोटी ६३ लाख ६७ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
या उद्दिष्टाचा पाठलाग करताना चारही जिल्ह्यांतील विविध बँकांनी ५ लाख २६ हजार ७५८ शेतकरी सभासदांना ३७४५ कोटी ७४ लाख ५३ हजार रुपये कर्जपुरवठा करत ८१.१० टक्के कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली.
मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ग्रामीण बँकेने १३५.१४ टक्के त्या पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ९८.१५ टक्के, तर व्यापारी बँकांनी सर्वांत कमी ६३.६७ टक्के कर्जपुरवठा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ९८.१४ टक्के कर्जपुरवठा केला आहे.
त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातील ७९.९० टक्के, हिंगोलीमध्ये ७२.६ टक्के तर परभणीत सर्वांत कमी ६९.४६ टक्के कर्जपुरवठा केला गेला आहे. नियोजनपूर्वक कर्ज पुरवठ्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता आल्याचे मत जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी व्यक्त केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.