Crop Damage Survey : खानदेशात शासनाकडून सरसकट पंचनाम्यांना खो

कृषिमंत्र्यांचे शेती पर्यटन; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Crop Damage Survey
Crop Damage SurveyAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात ४ ते ७ मार्च यानंतर ९ ते १८ मार्च यादरम्यान अनेक भागात पाऊस, गारपीट (Hailstorm) व वादळामुळे पिकहानी (Crop damage) झाली आहे.

पण शासनाकडून सरसकट पंचनाम्यांना (survey) खो देण्यात आला आहे. नुकसानीची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. परंतु अनेकांचा या नुकसानीत टक्केवारीच्या घोळामुळे समावेश झाला नसल्याची स्थिती आहे.

४ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या गारपीट व वादळात धुळ्यात सहा हजार हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर व जळगावात आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नंतर पुन्हा विविध टप्प्यांत गारपीट झाली.

वादळ आले. त्यात नुकसानीची आकडेवारी वाढली. पण हे नुकसान खानदेशात ५० हजार हेक्टरपेक्षा कमी दाखविले जात आहे. प्रशासन सात दिवस संपात होते.

त्या काळात फक्त प्राथमिक अंदाज व्यक्त केले गेले. वर्ग १ चे अधिकारीच बांधावर गेले. पण तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक शिवारात फिरकले नाहीत.

Crop Damage Survey
Crop Damage Survey : पीक नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांना गती

आता पंचनामे तातडीने करण्याचे शासन म्हणत आहे. पण यात ३० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचा मुद्दा प्रशासन पुढे करीत आहे.

काही भागात फक्त अंशतः नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी उल्लेख करून अहवाल शुक्रवारी (ता.२४) सादर केला जाईल, असेही दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करा, पिके आडवी झाली आहेत. त्यात पिकांना माती लागून कणसे, गव्हाच्या ओंब्या कुजत आहेत.

आडवी पिके उभी होणार नाहीत. केळीची पाने फाटून मोठी हानी झाली आहे. कलिंगडावर रोगराई आली आहे. दर घसरले आहेत.

यामुळे नुकसानीबाबत फूटपट्टी न लावता सरसकट पंचनामे करून प्रत्येक महसूल मंडळातील गावांचा समावेश करावा व बागायती, निमबागायती, बारमाही बागायती या आधारावर भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


कृषिमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा रोष
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खानदेशात नुकसानीची पाहणी केली. पण हा त्यांचा धावता दौरा होता. शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. धरणगाव तालुक्यात त्यांच्या ताफ्यावर कापूसफेक करण्यात आली.

गारपीट, वादळ ४ मार्चपासून होत आहे आणि कृषिमंत्री आता खानदेशात कशासाठी येत आहेत. ते पर्यटन करीत आहेत का, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

कृषिमंत्र्यांनी आपले काही समर्थक, शिवसेनेचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेटही घेतली. शेतकऱ्यांचे सांत्वन करण्याऐवजी भेटीगाठी करण्यात कृषिमंत्री व्यस्त होते, अशी टीकाही होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com