
नगर ः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस (Rainfall) सुरू असल्याने बहुतांश भागात खरिपाची पिके (Kharip Crop) हिरावली आहेत. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने कापूस, बाजरी, सोयाबीन कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. तुरीलाही (Tur Crop Damage) पावसाचा फटका बसत आहे.
कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती गोळा करून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार यंदा खरिपातील नुकसानीचा आकडा एक लाख हेक्टरच्यावर जाण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्यात यंदा खरिपात बाजरी, कांदा, कापूस, सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले गेले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पाऊस पडत आहे. सुरुवातीच्या काळात उडीद, मुगाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता सोयाबीन, कापूस, तूर, कांदा, बाजरीसह भाजीपाल्याला धोका पोचत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने कापसाच्या मुळ्या सडत असून पाने पिवळी पडली आहेत.
त्यामुळे पातेगळ, बोंडालाही नुकसान पोचत आहे. सोयबीनची काढणी सुरू असतानाच पाऊस सुरु असल्याने सोयाबीनची शेतकऱ्यांनी सोंगणी करता येत नाही. बाजरीही काढणीला आली, मात्र पावसामुळे काढणी करण्याला अडथळे निर्माण होत आहेत.
सर्वाधिक फटका सोयाबीनला बसत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन, कापसाचे क्षेत्र वाढले. पिकेही जोमात आली मात्र हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदा खरिपातील नुकसानीचा आकडा एक लाख हेक्टरच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा पावसामुळे कापूस, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. यंदा पिके चांगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांची पिके हिरावली आहेत.
- बाळासाहेब मरकड, शेतकरी, दहिगाव, ता. शेवगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.