यवतमाळ : वीज कोसळून अपघाताच्या (Accident due to lightning strike) घटनांमध्ये जिल्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांत अशाच घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, ११६ जनावरे ठार (Cattle Death)झाली आहेत. परिणामी जिल्ह्यात ११० मंडलांत वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यंदाच्या हंगामात वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार होती. त्यातच यवतमाळ जिल्ह्याचा बराचसा भुभाग हा जंगलव्याप्त आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटना सातत्याने घडतात. या घटनांना नियंत्रित ठेवण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा महत्त्वाची ठरते. ही यंत्रणा उंच ठिकाणी बसविण्यात येते.
त्यामुळे लगतचा काही प्रदेश वीज कोसळण्याच्या प्रकारापासून संरक्षित होतो. यवतमाळ जिल्ह्यातील ११० मंडलांत मात्र अशाप्रकारची यंत्रणाच नसल्याने वीज कोसळून व्यक्ती आणि जनावर ठार होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या चार महिन्यांत वीज पडून १३ जणांचा मृत्यू झाला तर ११६ जनावरे ठार झाली. वीज पडून दगावल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाते.
त्यानुसार १३ ही व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. चार महिन्यांत ५७ मोठी आणि ५९ लहान जनावरे ठार झाली आहेत. वीज पडून ठार झाल्यास चार लाख, ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास २ लाख, ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९,१०० तर आठवडाभरापेक्षा अधिक कालावधीसाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२,७०० रुपये मदत देण्याचे धोरण आहे.
चार ठिकाणीच अटकाव यंत्रणा
सध्या जिल्ह्यात केवळ चार ठिकाणीच अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामध्ये दोन यंत्र पुसद तालुक्यात आहेत. घाटंजी तालुक्यात विश्रामगृह आणि आश्रमशाळेवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रशासनाने उर्वरित ११० मंडलांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा असावी याकरिता निधीची मागणी शासनाकडे केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.