
परभणी ः मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केळीचे सीएमव्ही (CMV On Banana) रोगग्रस्त (कुकुंबर मोझॅक व्हायरस) ऊती संवर्धित रोपांमुळे नुकसान (Banana Crop Damage) झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रोगग्रस्त केळी पिकांचे नमुने भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) च्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत, अशी माहिती केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संयुक्त राष्ट्रीय अभ्यास सदस्य वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी दिली.
बऱ्हाणपूर जिल्ह्यात २०२२ च्या जून ते ऑगस्ट दरम्यान ऊती संवर्धित रोपांची लागवड केलेल्या सुमारे २ हजार एकरावरील केळीवर पहिल्या महिन्यातच सीएमव्ही रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे शेतकऱ्यांना केळीची १ लाख ५४ हजार ५०० झाडे उपटून टाकावी लागली.
नुकसानीचा अंदाज काढणे तसेच भविष्यात सीएमव्हीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना सुचविणे यासाठी केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या पुढाकारातून संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्यात आली.
या समितीचे अध्यक्ष दिल्ली विद्यापीठातील वनस्पती जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ प्रा. डॉ. इंद्रनील दास गुप्ता आहेत. सदस्यांत भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अमलेंदू घोष, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, कीटकशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, ऊती संवर्धन प्रयोगशाळा प्रमुख डॉ. आनंद दौंडे यांचा समावेश आहे.
या समितीने बुधवार (ता. ४) आणि गुरुवारी (ता. ५) बऱ्हाणपूर जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांकडील ९४. ६५ एकरांवरील केळीची पाहणी केली. रोगग्रस्त केळी पिकाचे नमुने घेऊन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतील निष्कर्षानतर सविस्तर अहवाल जैवतंत्रज्ञान विभागास सादर केला जाणार आहे.
सीएमव्हीचे लक्षणे...
- केळीच्या पानावर पिवळ्या रेषा आढळून येतात.
- झाडांची वाढ खुंटते.
- फळधारणा होत नाही.
सीएमव्हीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना...
- पिकांचा फेरपालट करावा. राष्ट्रीय ऊती संवर्धित रोपे प्रमाणिकरण संस्थेने दिलेले प्रमाणीकरण लेबल आणि क्यू आर कोड पाहून ऊती संवर्धित रोपे खरेदी करावीत.
- प्रादुर्भावग्रस्त केळीची झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावीत.
- शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यावर भर द्यावा.
केळीवरील ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये येत्या काळात अधिक संशोधन केले जाणार आहे. बऱ्हाणपूर तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी परभणी येथे जनजागृती कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
- डॉ. गजेंद्र जगताप,
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.