
Buldana News चिखली, जि. बुलडाणा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) बऱ्याच वेळा काही चोरटे चोरीचा शेतीमाल (Theft Agriculture Produce) अडते व्यापाऱ्यांना माल विकतात. यामध्ये विक्रीची सर्व प्रक्रिया केली जाते.
मात्र पोलिस तपासामध्ये सदर माल चोरीचा असल्याचा आढळल्यानंतर व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने लक्ष घालून व्यापाऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की बाजार समितीकडून रीतसर परवाना घेऊन अडते, व्यापारी आपला व्यापार करीत असतात. मात्र बऱ्याच वेळा चोरटे चोरलेला शेतीचा माल बाजार समितीमध्ये विकतात. व्यापारी सुद्धा त्या मालाची हर्राशी करून पट्टीसोबत पैसे त्याला देतात.
तो माल संबंधित व्यापारी बाहेरगावच्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकून टाकतात. घेतलेला माल शेतकऱ्याचाच आहे, असे त्या व्यापाऱ्याला वाटते परंतु कालांतराने पोलिस तपासामध्ये सदर माल चोरीचा असल्याचे उघड होते. पोलिस त्या चोरास पकडतात आणि त्याला घेऊन संबंधित व्यापाऱ्याकडे येतात.
या वेळी तुम्ही चोरीचा माल विकत घेतला, तुम्हीसुद्धा गुन्हेगार आहात अशी समज पोलिसांकडून दिली जाते. व्यापाऱ्याने स्वतः विकत घेतलेला माल, चोरीचा माल म्हणून ते पोलिस आपल्या ताब्यात घेतात. या वेळी व्यापाऱ्यांची मोठी फजिती होते. कारण बाजार समितीमध्ये येऊन माल विकणारा शेतकरी की चोरटा हे समजत नाही.
तरीही व्यवहारात त्यांना रीतसर पावती आणि पैसे परतावा म्हणून व्यापाऱ्यांकडून दिली जाते. मात्र पोलिस येऊन माल ताब्यात घेतात. या वेळी व्यापाऱ्यांनी दिलेली पावती आणि पैसे मात्र व्यापाऱ्यांना कधीच परत मिळालेले नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.