
पुणे : हवामानविषयक अंदाज (Weather Forecast) अधिक अचूक वर्तविण्यासाठी २०२५ पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार (Doppler Weather Radar) नेटवर्कच्या कक्षेत आणणार आहे. केंद्र सरकारने ‘आयएमडी’च्या (IMD) माध्यमातून पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या ३७ पर्यंत केली आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत आणखी २५ ची भर घालणार असल्याचे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी व्यक्त केले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) १४८ व्या स्थापना दिवस रविवारी (ता. १५) कार्यक्रम दिल्ली येथे आयोजित केला होता. त्या वेळी श्री. सिंह बोलत होते.
या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव अजय कुमार भल्ला, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र आदी उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, की जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार पश्चिम हिमालयीन राज्यांसाठी चार डॉप्लर रडारचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी २०० स्वयंचलित कृषी हवामान स्थानकांचे देखील राष्ट्रार्पण केले.
आयएमडीची आठ प्रकाशने देखील त्यांनी प्रकाशित केली आणि शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले. आयएमडीची सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये आणि अधिकारी यांना देखील त्यांनी पुरस्कार प्रदान केले.
कृषी हवामानशास्त्रीय सेवांतर्गत २०२५ पर्यंत ६६० जिल्हा कृषी हवामानशास्त्रीय केंद्र स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट आहे. चालू वर्षी या केंद्रांची संख्या ३१०० वरून २०२५ मध्ये ७००० पर्यंत वाढ करणार आहे.
या केंद्रामुळे हवामानाचा इशारा आणि सल्ला देणाऱ्या सेवांचा शेतकरी आणि मच्छीमारांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फायदा होत असल्याचे नॅशनल सेंटर फॉर ॲप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या एका ताज्या सर्वेक्षणात आढळले आहे.
शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांकडून जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर कृषी हवामानविषयक सल्ल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना विशेषत्वाने त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदे होत आहेत.
अल्प आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आणि धोरण विकासासाठी हवामान सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत.
आयएमडीने यापूर्वीच कृषी, आरोग्य, जल, ऊर्जा आणि आपत्ती जोखीम कपात या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये या सेवांचा वापर सुरू केला आहे. उत्पादनांमध्ये सोयीनुरूप केलेल्या बदलांच्या माध्यमातून त्यांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
आपल्या देशांत पिकांचे उत्पादन अजूनही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मॉन्सून आणि चक्रीवादळांसह हवामानाचे अचूक अंदाज देण्यासाठी आयएमडी सातत्याने सुधारणा करण्यावर भर देत आहे.
कटिबंधीय चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, धुके, उष्णतेची लाट, थंडीची लाट, मेघगर्जनांसह पाऊस अतिजास्त खराब हवामानाची भाकिते करण्यामध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे.
मॉन्सूनच्या अंदाजामुळे केवळ आपल्या अर्थव्यवस्थेमध्येच सुधारणा होत नसून दक्षिण आशियायी भागात मॉन्सूनच्या काळात येणारे पूर आणि त्याच्या अभावी निर्माण होणारे दुष्काळ यामुळे जाणाऱ्या बळींची संख्या कमी होत आहे.
अचूकतेमध्ये २० ते ४० टक्के वाढ
गेल्या पाच वर्षांत अतिजास्त खराब हवामानविषयक घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये २० ते ४० टक्के वाढ झाली आहे. हवामानाच्या अंदाजाचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणाम होत आहे.
तसेच चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, गडगडाटासह पाऊस, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट इ. अतितीव्र खराब हवामानाच्या घटनांच्या काळात जीवितहानी कमी करण्यासाठी अचूक अंदाज आणि वेळेवर दिले जाणारे इशारे यांचा चांगलाच फायदा झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.