
Ratnagiri News : ‘‘जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून ‘हर घर हर जल’युक्त गावे बनविण्यासाठी १ हजार ४९६ गावांमध्ये १ हजार ३५३ योजनांचा आराखडा तयार केला आहे. कामाचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९७ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ११० गावे ‘हर घर नलसे जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९०० कोटींचा निधी आहे.
या कामांचा दर्जा पाहण्यासाठी त्रयस्त लेखआपरीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
२०२२-२३ जिल्हा वार्षिक योजनेतून २७१ कोटींचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी ३१ मार्चअखेर खर्च झाला आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३०० कोटींच्या आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यातील १० टक्के निधी म्हणजे २३ कोटी जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. १ हजार ९९० कामांना यातून मंजुरी दिली आहे. आता किती कामांच्या निविदा, वर्कऑर्डर दिली याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. १७) बैठक होईल. ‘‘जिल्ह्यात २०२१ ला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ नद्यांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा नियोजनमधून वेगळा, जलसंपदा विभागाचा वेगळा आणि काही सामाजिक संस्थांचा मिळून सुमारे ११ कोटी ३० लाखांचा निधी मिळाला. त्यापैकी ८ कोटी चिपळूणला देण्यात आले आहेत. टप्पा २ मधील गाळ ५ जूनपूर्वी काढण्याचा प्रयत्न आहे,’’ असेही सिंह म्हणाले.
‘सिंधुरत्नसाठी आराखडा तयार’
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी असलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांना दिले.
पुढील तीन वर्षांचे काय नियोजन आहे, ते दाखविण्यात आले. योजनेअंतर्गत १३५ कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. ३०० कोटींचा हा आराखडा असून, दरवर्षी १०० कोटींची कामे घेतली जातील.
त्यामुळे वैयक्तिक लाभासह अन्य कामांचा यामध्ये समावेश आहे. अधिकाधिक लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.