
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील मडुरा (ता. सावंतवाडी) परिसरातील कुळीथ, चवळी, मिरची, वाल, या रब्बीतील पिकांवर (Rabi Crop) करपा रोगांचा प्रादुर्भाव (Karapa Disease) दिसून येत आहे. या भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला होता त्याचाच हा परिणाम मानला जात आहे.
खरीप हंगामातील भातपीक कापणी आटोपल्यानंतर तत्काळ जिल्ह्याच्या अनेक भागांत रब्बी हंगामाला सुरुवात होते. काही भागांत पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शेतकरी जलदगतीने मशागत करून रब्बी पिकांची तयारी करतात. यावर्षीदेखील नोव्हेंबरमध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली. जिल्ह्यात कुळीथ, भुईमूग, चवळी, वाल, मूग, उडीद, विविध प्रकारचा भाजीपाला अशी पिके या हंगामात घेतली जातात.
सावंतवाडी तालुक्यातील मडुरा परिसरातील मडुरा, पाडलोस, कास, शेर्ले, निगुडे, रोणापाल, सातोसे, न्हावेली, दांडेली, विलवडे, वाफोली, सरमळे या भागांतदेखील भाजीपाल्यासह विविध कडधान्यांची पिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. यावर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
सध्या बहुतांश पिकांना फळधारणा तर काही ठिकाणी फुलोरा येत असतानाच या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. याशिवाय तुडतुड्यांचा प्रादुर्भावदेखील जाणवत आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर काही दिवस राहिलेले ढगाळ वातावरण यामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या हातून पीक निसटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.