
Pune News : नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी, श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभेच्या वतीने गुरुवार (ता.२६) ते शनिवारी (ता.२८) अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा (Farmer March) काढण्यात येणार आहे.
अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने काढण्यात येईल.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा मोर्चा धडकेल. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.
राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे बरबाद केली. सरकारने या पिकांना मदत देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही.
वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र जमीन नावे करण्याऐवजी पोलिस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा, सुपरवायझर, आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार त्यांचे प्रश्न तीव्र झाल्याने हैराण झाले आहेत. हे प्रश्न घेऊन विखे-पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा किसान सभेतर्फे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदींनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.