
Nashik News : तालुक्यातील रवळजी येथील नर्मदाबाई दौलत शिंदे यांच्या गट नं.१२९ मधील कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने २५० क्विंटल कांदा सडला आहे. यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कृषी व महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करावा व पोलिस विभागाने नुकसान करणाऱ्याला पकडून कठोर शासन करावे, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी नर्मदाबाई शिंदे यांनी केली आहे.
येथील शेतकरी नर्मदाबाई दौलत शिंदे यांची रवळजी ते देसाराणे शिवारात गट नं.१२९ ही शेतजमीन आहे. त्यांचे वास्तव्य शेतशिवारातच आहे. त्यांच्या घराशेजारी दोन कांदा चाळी आहेत. पैकी शंभर शंभर फुटांचे दोन कप्पे असलेल्या दोनशे फुटांच्या चाळीत जवळपास अडीच हजार क्विंटल उन्हाळ कांदा साठवलेला आहे.
या कांद्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी कांदा चाळ फोडून पहिली असता आतील संपूर्ण कांदा सडला आहे. या कांद्यात युरियाचे गोळे आढळून आले आहेत. अज्ञात व्यक्तीने हा युरिया टाकल्याचा त्यांना संशय आहे. यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च व वार्षिक पीक वाया गेले आहे.
आधीच अस्मानी सुलतानी संकटांवर मात करीत त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांनी कांदा पिकविला होता. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा चाळीत साठवला होता. मात्र अज्ञाताने चाळीत युरिया टाकून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविले आहे.
कांदा लागवडीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन लाखांचे पीककर्ज व नातलगांकडून हात उसनवारीने पैसे घेतले होते. हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने त्यांचेवर या घटनेमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
अवकाळी व गारपिटीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने फुकाचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असताना या स्थानिक संकटानेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
झालेल्या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत व पोलिसांनी या समाज कंठकांचा बंदोबस्त करून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नर्मदाबाई शिंदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.