राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : देशाच्या ऊस हंगामामध्ये (Sugarcane Season) यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे. १५ जानेवारीअखेर महाराष्ट्राने अन्य राज्यांना मोठ्या फरकाने मागे टाकत साखर उत्पादनात (Sugar Production) आघाडी घेतली.
महाराष्ट्रात या कालावधीत ६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशात ४० लाख टन साखर तयार झाली आहे.
ही गती पाहता या हंगामात महाराष्ट्रच साखर उत्पादनात टॉप ठरेल, अशी शक्यता आहे.
देशाने साखर उत्पादनाचे दीडशतक पार केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल ६० लाख टनांचा आहे. कर्नाटकने ३३ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा देशात सहा लाख टन साखर या कालावधीपर्यंत जादा उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी ५०७ कारखान्यांनी १५० लाख टन साखर तयार केली होती.
यंदा ५१५ कारखान्यांनी १५६ लाख टन साखर तयार केली.
यंदा ऑक्टोबरला देशात साखर हंगाम सुरू झाला, परंतु पावसाळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर हंगाम जवळ जवळ पंधरा दिवस लांबला.
सुरुवातीला गती एकदम कमी असली तरीही पहिल्यापासूनच महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात गतीने हंगाम सुरू झाला. महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या ज्यादा आहे.
देशातील एकूण ५१५ साखर कारखान्यांपैकी महाराष्ट्रातच १९८ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम सुरू केला आहे. नोव्हेंबरनंतर हवामान अनुकूल बनल्याने राज्याने साखर हंगामात इतर राज्याच्या तुलनेत गती घेतली.
सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेशपेक्षा दहा ते बारा लाख टनांनी महाराष्ट्रात साखर उत्पादन जास्त होत होते. जानेवारीच्या पहिल्या पंधराव्या अखेरची आघाडी वाढत जाऊन आता ती वीस लाख टनांवर झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत महाराष्ट्रात सुमारे दोन लाख टन साखरेचे उत्पादन जास्त आहे.
महाराष्ट्र उत्तर प्रदेश व कर्नाटक वगळता अन्य राज्यांमध्ये साखर उत्पादन खूप कमी झाले आहे. गुजरातमध्ये केवळ ४ लाख टन, तमिळनाडूत ३.५ लाख, तर अन्य राज्यांमध्ये मिळून १३ लाख टन साखर तयार झाली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अनुमानानुसार देशभरातील यंदाचा गाळप हंगाम एप्रिलअखेर पूर्ण होईल व त्यातून सुमारे ३४३ लाख टन नवे साखर उत्पादन होईल, जे गतवर्षीच्या ३५९ लाख टनांच्या तुलनेत सुमारे १६ लाख टनांनी कमी असण्याचा अंदाज आहे.
या व्यतिरिक्त जवळपास ४५ लाख टन साखरेचे उत्पादन हे इथेनॉल निर्मितीकडे वळविले जाणार असल्याने पुन्हा एकदा यंदा एकूण साखर उत्पादन विक्रमी ३९० लाख टनांच्या आसपास होणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.
६७ लाख टन साखर शिल्लक राहणार
एकूण ३९० लाख टन नवे साखर उत्पादन व हंगाम सुरुवातीची शिल्लक ६१ लाख टन लक्षात घेता ढोबळमानाने एकूण ४५१ लाख टन साखरेपैकी २७५ लाख टनांचा स्थानिक खप, ४५ लाख टनांचा इथेनॉलसाठी वापर आणि
६४ लाख टनांची अपेक्षित निर्यात लक्षात घेता हंगामाअखेर सुमारे ६७ लाख टन साखर शिल्लक राहण्याचे अनुमान असून, ती देशातील अडीच महिन्यांचा स्थानिक खप भागवू शकते, असे दांडगावकर यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.