
APMC Election Vidarbh विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला नाकारले असून, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी प्रतिष्ठेची केली होती.
केदार गटापासून वेगळे झालेल्या सचिन किरपान यांनी केदारांच्या विरोधात शेतकरी सहकारी उभे केले.
परिणामी केदार यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी युती केली. मात्र तरीही त्यांना रामटेक बाजार समिती आपल्याकडे राखता आली नाही. किरपान यांनी एकूण १४ जागा जिंकल्या.
त्यापैकी सेवा सहकारी सोसायटी गटातील सर्व ११ जागांचा समावेश आहे. व्यापारी-अडते गटातून दोन, तर हमाल मापारी गटातून एक जागा त्यांनी जिंकल्या. भाजपने शेतकरी विकास पॅनेल उभे केले होते, त्यांना ग्रामपंचायत गटातील चार जागांवर विजय मिळवता आला.
यवतमाळ जिल्ह्यातही अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. संजय राठोड यांची दिग्रस बाजार समितीवर एक हाती सत्ता होती.
त्यांना ही सत्ता कायम राखता आली नाही. माजी मंत्री संजय देशमुख यांनी त्यांना धक्का दिला. संजय देशमुख यांनी राज्यात घडलेल्या सत्तांतरणाच्या घडामोडीनंतर शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश घेतला होता.
या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांच्या शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने विजय मिळवला.
या माध्यमातून सहकार क्षेत्रावर त्यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे. आर्णी (यवतमाळ) बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे.
महागाव (यवतमाळ) बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांच्या गटाला मतदारांनी धक्का दिला. परंतु पुसद बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांनी वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना चारीमुंड्या चित केले.
भाजपकडून आमदार अॕड नीलय नाईक यांनी आपल्या पॅनेलच्या माध्यमातून मनोहरराव नाईक यांना आव्हान दिले होते.
मात्र मतदारांनी मनोहर नाईक यांच्या बाजूनेच कौल दिला. यवतमाळ बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काँग्रेस (माणिकराव ठाकरे) गट बाजार समितीवर सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
१८ पैकी ११ जागा काँग्रेस गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. चार जागांवर भाजप तर तीन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. यापूर्वी बाजार समितीवर काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला पूर्ण कौल दिला.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा बाजार समितीवर माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक हाती सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.
चांदूर रेल्वेमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप, मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, आमदार यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार गटाचे दहा संचालक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजप व सहकारी पॅनेलचा प्रभाव झाला आहे.
अमरावती बाजार समितीवर देखील काँग्रेसने सत्ता राखली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनेलने या ठिकाणी विजय मिळवला. आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपवर नाना पटोले यांचा शाब्दिक हल्ला
बहुतांश बाजार समित्यांमध्ये भाजपला मतदारांनी नाकारले. ही संधी साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला केला आहे. विधानसभा निवडणुकीचे हे ट्रेलर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
विदर्भात मिळालेल्या जागा
भंडारा : २ समित्या, १ (काँग्रेस) १ भाजप आघाडी,
अमरावती : ६ समित्या, ५ (काँग्रेस), एक अपक्ष
चंद्रपूर : ९ समित्या, ७ काँग्रेस, २ भाजप
यवतमाळ ः ७ समित्या, ४ महाविकास, एक राष्ट्रवादी- एक शिंदे गट, १ भाजप.
गडचिरोली : ३ समित्या, तीनही अपक्ष
गोंदिया : ४ समित्या, २ अपक्ष, २ भाजप
वर्धा : ४ समित्या, ४ (काँग्रेस)
नागपूर : ४ समित्या, तीन (काँग्रेस), एक अपक्ष
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.