
तळा : बंगालच्या उपसागरात आलेल्या मन्दोस चक्रीवादळामुळे तळा तालुक्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणामुळे आंबा, काजू मोहर लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजीपाला पिकांवरही परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
आंबा, काजू हे पिकांना डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान मोहर येण्यास सुरुवात येते. मात्र, काही दिवसांपूर्वी मन्दोस चक्रीवादळाचा परिणाम, कोकण किनारपट्टीवरही जाणवत आहे. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम आंबा आणि काजू पिकांची मोहर प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता आहे.
मोहर प्रक्रिया उशिरा झाली, तर फळ येण्यास विलंब होणार आहे. यामुळे त्या फळांना भावही कमी मिळतो. एप्रिल अखेरीस आणि मे महिन्यात आंबा विक्रीसाठी आल्यावर त्याला बाजारात अधिक भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळतो. तोच जूनमध्ये आल्यावर त्याला कवडीमोल किंमत मिळते. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत आहेत.
भाजीपाल्यांवर प्रादुर्भावाचा धोका
तळा तालुक्यातील वावेहवेली, राणेची वाडी, वानस्ते, बामणघर, बोरघर हवेली, पिटसई या भागांत भाजीपाला लागवड, कलिंगड, कारली, अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तोटा सहन करावा लागणार आहे, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकास मोहर उशिरा आल्यावर फळे उशिरा लागतात. काढणीस योग्य फळांना उशीर झाल्याने बाजारात भाव कमी मिळतो. सध्या धरलेले मोहर आणि पालवी ढगाळ वातावरणामुळे गळून पडत आहे.
- भागोजी कदम, आंबा बागायतदार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.