
Mango Damage In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनासह फलोत्पादन आणि शेती उत्पादनावरही झाला आहे.
या वाढत्या तापमानामुळे शहापूर तालुक्यातील अनेक आमराईंमधील आंबे गळून पडत असल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. या वर्षा तालुक्यातील बाजारपेठेत स्थानिक आंब्यांची आवक कमी झाली आहे.
शहापूर तालुक्यातील बिरवाडी, लाहे, दहिगाव, काष्टी, साजिवली आणि खर्डी येथे अनेक आंब्याच्या बागा आहेत, पण यंदा वाढत्या उष्णतेमुळे झाडाला आलेले आंबे गळून पडत आहेत. वाशाळा येथील उमेश धानके हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आपल्या जागेत दहा वर्षांपूर्वी ३०० आंब्यांची झाडे लावली आहेत.
यामधून त्यांना दरवर्षी सात ते आठ लाख रुपये इतके उत्पन्न होते. या वर्षीही तितकेच उत्पन्न मिळेल या आशेत ते होते, मात्र तीन दिवसांच्या वाढत्या तापमानामुळे आंब्यावर परिणाम झाला असून आंबे झाडावरून पडायला सुरुवात झाली. त्यामुळे झाडाखाली खच पडला आहे. खर्डी येथील प्रवीण अधिकारी यांच्या दोन बागांतील २०० च्या आसपास झाडांवरील आंबे गळून पडले आहेत.
अधिकाऱ्यांकडून पाहणी
गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असल्याने असा बदल फळ उत्पादनात झाल्याचे कृषी पर्यवेक्षक महादेव कालापाड यांनी सांगितले; खर्डीचे सहकृषी अधिकारी गोकुळ अहिरे आणि जय वाघ यांच्यासोबत खर्डीचे प्रवीण अधिकारी व वाशाळाचे उमेश धानके यांच्या आमराईत पाहणी केली.
बुरशीचाही प्रादुर्भाव
काही दिवसांअगोदर पाऊस पडल्याने आणि वातावरणात चढ-उतार असल्याने आंब्यांना बुरशी लागून आंबे खराब झाले; तर कडक उन्हामुळे आंब्यांची देठ सुकून आंबे गळत असल्याने तालुक्यातील अनेक आमराईच्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.