
विक्रमगड : गेल्या काही वर्षांपासून आंबा बागांचे गणित बिघडल्याचे दिसून येत आहे. हंगाम (Mango Season) लांबणीवर अन् उत्पादनातही (mango Production) घट होत आहे. आंबा ऐन बहरात असतानाच वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे (Climate Change) बागायतदारांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात दरवर्षी ६० ते ७० टक्के घट होत असल्याचे विक्रमगडमधील आंबा बागायतदार सांगत आहेत.
या वर्षी लांबलेला पाऊस तसेच नोव्हेंबर महिन्यात योग्य थंडी पडून मोहोर येण्याच्या पोषक काळात वातावरणात बदल झाल्याने आंबा झाडांना मोहोर न येता मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली आहे. त्यामुळे आंबाच्या झाडांना मोहोर येईल की नाही या चिंतेत विक्रमगड तालुक्यासह परिसरातील आंबा बागायतदार आहेत.
तालुक्यातील ९० टक्के झाडांना पालवी
हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे विक्रमगड तालुक्यातील आंबा बागायतदार हैराण झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या विक्रमगड तालुक्यातील ९० टक्के आंब्याच्या झाडांना पालवी आली आहे. अशाच प्रकारे वातावरणात बदल राहिला तर मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास उशीर होईल, असे तालुक्यातील आंबा बागायतदारांनी सांगितले आहे.
१८३ हेक्टरवर लागवड
विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पदन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यातील येथील आंबा बागायदार विजय सांबरे, महेश पाटील, झडपोली येथील व्ही. जी. पाटील, माण येथील कोरे, नंदकुमार पाटील आदी शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्पादन घेत असुन चांगला नफा मिळवत आहेत; परंतु गेल्या दोन चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.